Manoj Jarange : आमचा अपमान झाला ते झाला, आता माफी मागून काय फायदा असे विधान पीएम मोदी यांच्या माफीनाम्यावर मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारा तुरुंगात गेला पाहिजे अशी सुद्धा भूमिका जरांगेंनी घेतली आहे.
छत्रपतींवरुन राजकरण नको मनोज जरांगेंचा सल्ला
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेत्यांना खूप जागा आहेत राजकारण करायला. पण अश्या प्रकरणात राजकारण करू नका. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. याप्रकरणात जो कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आत मध्ये टाकलं पाहिजे. सर्वांनी याप्रकरणी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
टेंडर घेणारे लोक हरामखोर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, टेंडर घेणारे लोक हे हरामखोर असतात त्यांना कशात काय खावं ते कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण भ्रष्टाचार करतात खातात. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केले नाही तर आम्हाला मुद्दा हाती घ्यावा लागेल, असा सज्जड दम जरांगे पाटील यांनी भरला आहे.