Ramdas Athawale On Malvan Shivaji Maharaj Statue : रामदास आठवले यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्या घटनेनंतर भाजपला घरचा आहेर दिला आहे. पुतळा वाऱ्याने पडत नाही, नव्या कलाकाराला काम देणं ही चूक असल्याचं ते म्हणाले.
हवेने पुतळे पडले असं होत नाही…
देशभरात असे हजारो पुतळे आहेत. कन्याकुमारी, हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असे तीन समुद्राच्या ठिकाणी आहेत. कन्याकुमारीतही अनेक पुतळे आहेत, पण कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीने हवेने पुतळे पडले असं होत नाही. एखादं प्रचंड मोठं वादळ वैगेरे आले, घरांचे, इमारतींचे नुकसान झालं तर आपण समजू शकतो. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिले आहेत आणि या सगळ्याची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई होईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुतळा पडणे दुर्दैवी, पण राजकारण करू नये
माझा पक्ष जसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, तसाच छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मानणारा माझा पक्ष आहे. सर्व महाराष्ट्रातील जनता महाराजांना आदर्श मानतात आणि त्यांचा पुतळा अशा प्रकारे पडावा ही बाब अत्यंत गंभीर आहे, घटना दुर्दैवी आहे. पण यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून जो मुख्य आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. हा पुतळा नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी बसवला, त्यामुळे नेव्हीचे अधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या सगळ्यांचीही चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.
पुतळा हवेनं पडत नाही, नवख्या कलाकाराला काम देणं ही चूकच; रामदास आठवलेंकडून सरकारला घरचा आहेर
मोदींनी माफी मागितली, त्यानंतर राजकारण करणं चुकीचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी आले होते. ते या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यालाही आले होते. मात्र त्यांनी महाराजांची माफी मागितली आहे. पण त्यानंतरही राजकारण केलं जात आहे हे काही योग्य नाही. यामध्ये कोणीही राजकारण करू नये, सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा नव्याने पुतळा या ठिकाणी उभा करून भव्य दिव्य असं स्मारक कसे उभे राहील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. चांगल्या कलाकाराला तो पुतळा करायला द्यायचा आहे, ही आपली सूचना असल्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली आहे.