Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं कंबर कसली आहे. पण २१ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. त्यांचा राष्ट्रवादीला स्पष्ट विरोध आहे. हर्षवर्धन पाटील, समरजीत घाटगे, गणेश हाकेंनी राष्ट्रवादीविरोधात उघड भूमिका घेतली आहे. पैकी घाटगे आज शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत. ते राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांविरोधात कागलमधून निवडणूक लढतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगेंनी कागलमधून, तर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरातून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी केली. पण राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत गेली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवारांनी बंड करत महायुतीत प्रवेश केला. अजित पवार महायुतीत असल्यानं पाटील, घाटगेंची गोची झाली. लातूरच्या अहमदपूरमधून भाजपच्या गणेश हाकेंना निवडणूक लढवायची आहे. पण तिथेही दादा गटाचा आमदार असल्यानं हाकेंची अडचण झाली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीला लक्ष्य करत आहेत.
कधीकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे वरिष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत महायुतीत गेले. साताऱ्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याशी त्यांचं पटत नाही. त्यामुळे रामराजे महायुतीत नाराज आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला आहे. सोलापूरमधील भाजपचे नेते उत्तमराम जानकर, प्रशांत परिचारकदेखील बदललेली समीकरणं पाहता शरद पवार गटात जाऊ शकतात.
‘अजित पवार गटातील २१ आमदार २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात लढून जिंकले आहेत. यातील काही उमेदवारांचा तर निसटता पराभव झाला,’ असं मराठवाड्यातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ‘दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात लढत आहेत. जमिनीवर संघर्ष करत आहेत. दोन्ही पक्षांची वैचारिक बैठक वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोबत येणं अवघड आहे. लोकसभेला ते दिसलं आहे,’ असं या नेत्यानं सांगितलं.
Maharashtra Assembly Election: हवी विधानसभेची जागा, पण अडथळा ठरताहेत दादा; भाजप, राष्ट्रवादीत ‘२१ अनपेक्षित’, संघर्ष तीव्र
अजित पवार महायुतीत आल्यानं भाजपमधील अनेक नेते नाराज झाले. आता ते त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त करु लागले आहेत. ‘अजित पवारांमुळे आपली संधी हातून जात असल्याचं भाजप नेत्यांच्या लक्षात आलं आहे. मतदारसंघातील आपला जम विस्कळीत होईल अशी भीती त्यांना वाटते. दादांचे आमदार पुन्हा निवडून आल्यास पाच वर्ष पुन्हा वाट पाहावी लागेल, अशी रास्त भीती नेत्यांना वाटते,’ असं भाजपच्या नेत्यांना सांगितलं.