Maharashtra Politics: लोकसभेला राज्यात जोरदार फटका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी अतिशय सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे देशभरातील अनेक नेते सध्या राज्यात आले आहेत.
देशाच्या विविध भागांमधील भाजपचे नेते, मंत्री खासदार विधानसभेसाठी राज्यात येणार आहेत. निवडणूक संपेपर्यंत त्यांचा मुक्काम राज्यात असेल. या प्रवासी नेत्यांची आणि विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची ३१ ऑगस्टला ८ तास बैठक झाली. त्यात या नेत्यांना ढाब्यावरील जेवणासह अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. लोकमतनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक होईल असा अंदाज आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने भाजपचे प्रवासी नेते राज्यात असतील. एक-दोन राज्यांच्या बड्या नेत्यांना एक-एक विभाग वाटून देण्यात आलेले आहेत. विदर्भ, मराठवाडा अशी विभागवार जबाबदारी दिली गेली आहे. लोकसभेला भाजपला मध्य प्रदेशात २९ पैकी २९ जागांवर यश मिळालं. या यशात मोलाचा वाटा असलेल्या चार नेत्यांकडे विदर्भातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यातील तिघे मंत्री आहेत. लोकसभेला भाजपला विदर्भात अवघ्या दोन जागा मिळाल्या. तर काँग्रेसनं ५ जागांवर विजय मिळवला.
भाजपच्या प्रवासी नेत्यांपैकी अनेकांना जिल्हावार, विभागनिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे. १९८० पासून भाजपचे किंवा त्याही आधी जनसंघाचे कोण कोण नेते आहेत, त्यांना भेटा, विश्वासात घ्या आणि विधानसभेला त्यांना सक्रिय करा, अशा सूचना प्रवासी नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. प्रवासी नेत्यांनी त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेसह कोणत्याही गोष्टीसाठी स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांकडे काहीही मागू नये, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.
Maharashtra Politics: लोकसभेला धाबे दणाणले, आता भाजप सावध; धाब्यावर जाऊ नका, ‘त्या’ नेत्यांना सूचना; कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या विश्वासातले मानले जाणारे गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल चार दिवसांपासून अमरावतीत मुक्कामाला आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सामान्य कार्यकर्ते, सामान्य माणसांना भेटत आहेत. त्यासाठी गावोगावी जात आहेत. जनभावना जाणून घेऊन त्याची माहिती वर दिली जात आहे. प्रसिद्धी माध्यमांपासून चार हात लांब राहून, पूर्णपणे गुप्तता पाळून अनेक जण वरुन दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत.