Dhananjay Munde: परभणी दौऱ्यावर पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देखील दिले.
शरद पवार यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार- महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का ?
हे महायुतीचे सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचा पिक विमा असेल, शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल, तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे, अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला शरद पवार यांना का घालवायचे आहे? असा सवालच धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
काल (मंगळवार) कोल्हापूर येथे जाहीर सभेत शरद पवार यांनी राज्यातील हे महायुतीचे सरकार आपल्याला घालवायचे आहे असे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. धनंजय मुंडे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेश विटेकर, महिला जिल्हाध्यक्ष भावना नखाते युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, महायुतीचे हे सरकार राज्यांमध्ये चांगले काम करत आहे. मागील चार दिवसात मराठवाड्यासह विदर्भामध्ये अतिवृष्टीचा तडाका बसला. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह त्यांच्या गुराढोरांचे आणि घरांचे देखील नुकसान झाले आहे. आम्ही सर्व पाहणी करत आहोत, उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होणार आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे, तुम्ही तोंडात चांदीचा चमचा पकडून जन्म घेतला; माझ्यासोबत…; कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे चॅलेंज
पिक विमा कंपन्यांनी 15 दिवसात 25% अग्रीम द्यावा
नियमानुसार एका दिवसात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर सरसकट नुकसान पकडून पीक विमा कंपन्यांनी पंधरा दिवसांमध्ये पिक विम्याचा 25% अग्रीम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असा नियम आहे. त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी पंधरा दिवसात शेतकऱ्यांना 25% अग्रीम तात्काळ द्यावा. त्याचबरोबर बहात्तर तासात शेतकऱ्यांनी आपली तक्रार ऑनलाइन दाखल करावी लागत आहे. पण या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात लाईट इंटरनेटची सुविधा कोलमडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत आणि पिक विमा कंपन्यांनी ते ग्राह्य धरून तात्काळ आगरी विमा द्यावा, असेही धनंजय मुंडे म्हणाले.