महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Sept 2024, 5:40 am
Ganesh Utsav : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य सरकारने टोल माफी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शासन निर्णय काढत घोषणा केली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईतून हजारोंच्या संख्येने उत्सवप्रेमी नागरिक कोकणात आपल्या गावी जातात. या भाविकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी टोलमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी त्यासंदर्भातील आदेश स्थानिक वाहतूक पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे स्थानिक वाहतूक पोलिसांकडे टोलमाफीचे पास घेण्यासाठी येणाऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी यावे लागत होते. पण अखेर आज शासन निर्णय काढत मुख्यमंत्र्यांनी टोल माफीचा निर्णय पुन्हा जाहीर केला.
गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.
गुडन्यूज! अखेर शासन आदेश निघाला, राज्य सरकारकडून गणेशभक्तांना टोल माफ; पाहा कसा मिळेल पास
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.