महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Sept 2024, 2:47 pm
Noise Pollution Strict action on mandal if rule breaks: यंदा गणेशोत्सवात गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत आणि ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभ्या करून कर्णकर्कश्य दणदणाटाने पुणेकरांचे डोके भणाणून सोडणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि ध्वनियंत्रणा (साउंड सिस्टीम) चालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
यंदाचा गणेशोत्सव ध्वनि प्रदूषणमुक्त असावा, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार व सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढाकार घेतला असून, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१, च्या कलम ३६ नुसार निर्बंधांचे आदेश काढले आहेत. हे निर्बंध सात ते २१ सप्टेंबरपर्यंत शहरात लागू असणार आहेत.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना करताना व अनंत चतुर्दशीला विसर्जन करताना गणेश मंडळांनी काढलेल्या मिरवणुकांमध्ये आवाजाचा दणदणाट करणाऱ्या ध्वनियंत्रणेचा वापर केला होता. बहुतांश नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेले वर्षभर नागरिकांच्या बाजूने भूमिका मांडत यंत्रणांसमोर प्रश्न उपस्थित केले. दहीहंडीमध्ये पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले होते; पण त्यानुसार कारवाई झाली नसल्याकडे लक्ष वेधले. अखेर, डेसिबलच्या मर्याोकडे दुर्लक्ष करून मोठमोठे स्पीकर लावून मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ध्वनिमर्यादेचे वारंवार उल्लंघन करतात, असा ठपका ठेवत पोलिसांनी तीव्र कारवाईचे संकेत दिले आहेत.
कायदा सुव्यवस्थेसाठीच निर्बंध
गणेशोउत्सव दणदणाटी आवाजात साजरा करण्यासाठी गणेश मंडळांकडून हट्ट धरला जातो. त्यामुळे पोलिस व मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष-संघटनांचे नेते-कार्यकर्ते यांच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांना आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गणेश प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या पदाधिकारी-सदस्यांना आणि ध्वनियंत्रणा चालकांना निर्बंध घालणे आवश्यक आहे, असे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचेही आदेश
धार्मिक सण-उत्सवातील ध्वनि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणाम होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ‘डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य’ या जनहित याचिकेवरील निवाड्यात ध्वनि प्रदूषण (नियमन व नियंत्रण) कायदा २००० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या काटेकोर अंमलबजावणाचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षांत गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनि प्रदूषण केल्याबद्दल पोलिसांनी १८० मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अशी आहे आवाजाची मर्यादा
विभाग दिवसा रात्री
औद्योगिक – ७५ डेसिबल – ७० डेसिबल
वाणिज्य – ६५ डेसिबल – ५५ डेसिबल
निवासी – ५५ डेसिबल – ४५ डेसिबल
शांतता क्षेत्र – ५० डेसिबल – ४० डेसिबल
पोलिसांची गणेश मंडळे आणि ध्वनियंत्रणा चालकांना तंबी
– मंडळाच्या वतीने वाजविण्यात येणाऱ्या ध्वनि यंत्रणेचा आवाज उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार योग्य मर्यादेपर्यंत राहील, याची खबरदारी घ्या.
– महापालिकेने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रामध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्या.
– अन्यथा, डेसिबल मीटरचा वापर करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकाच्या भिंती लावून उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल
काय कारवाई होणार?
गणेशोत्सवात कर्णकर्कश्य ध्वनिक्षेपकाच्या भिंती लावून निर्बंधांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि ध्वनि यंत्रणा चालकांवर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३४ व अन्य कायद्यांनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.