Nashik News: धोकादायक वाडे सुटेना! ४६७ वास्तूंत जीव मुठीत धरुन नागरिकांचे वास्तव्य, नोटिसांना केराची टोपली

Nashik News: महापालिकेने अंतिम नोटिसा बजावल्यानंतर ४६८ पैकी नाशिक पश्चिममधील तेली गल्लीतील अवघ्या एका वाडेधारकाने वाडा पाडण्याची तयारी दर्शवत पाडकामासाठी लागणारा एक लाख ४६ हजारांचा निधी जमा केला आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेकडून वारंवार नोटिसा देऊनही शहरातील १,१८१ धोकादायक वाडे व इमारतींपैकी अतिधोकादायक ४६७ वाड्यांमध्ये अजूनही नागरिक जीव मुठीत धरून राहत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या नागरिकांकडून वाडे पाडकामास नकार दिला जात असल्याने पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली जात असल्याची स्थिती आहे.

महापालिकेने अंतिम नोटिसा बजावल्यानंतर ४६८ पैकी नाशिक पश्चिममधील तेली गल्लीतील अवघ्या एका वाडेधारकाने वाडा पाडण्याची तयारी दर्शवत पाडकामासाठी लागणारा एक लाख ४६ हजारांचा निधी जमा केला आहे. त्यामुळे महापालिकेने हा वाडा पाडून परिसर सुरक्षित केला असला, तरी अन्य वाडेधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाडेधारकांवर दंडात्मक कारवाईसह वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड, देवळाली गाव, सातपूर या गावठाणांमध्ये हजारो नागरिक आजही जुनी घरे, इमारती आणि वाड्यांमध्ये राहत आहेत. काही इमारती व वाडे अतिधोकादायक असूनही नागरिक त्यात वास्तव्याला आहेत. अनेक वाड्यांबाबत न्यायालयांमध्ये वाद सुरू असल्याने हक्क जाईल या भीतीने नागरिक वाडे मोडकळीस आल्यानंतरही घरे रिकामे करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळा आला, की दरवर्षी एखादी जुनी इमारत किंवा वाडा कोसळून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना वारंवार होत असतात. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक इमारती, घरे व मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यांना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, गंभीर घटना होईपर्यंत या इमारतींतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील १,१८१ वाडेधारकांना नोटिसा देऊन घरे रिकामे करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्या नोटिसांना नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १,१८१ पैकी ४६८ वाडे अतिधोकेदायक स्थितीत आढळून आले होते. त्यांना पालिकेने अंतिम नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी तेली गल्लीतील रहाळकर रोडवरील एकाच वाडेधारकाने वाडा पाडण्याची तयारी दर्शविली. परंतु, उर्वरित ४६७ अतिधोकादायक वाड्यांमध्ये नागरिक अजूनही जीव मुठीत धरून निवास करत असल्याचे चित्र आहे.
Nashik Vidhan Sabha: नाशिक ऑप्शनला टाकावा लागेल, राज ठाकरेंनी इशारा खरा केला? मनसे नेत्यांमध्ये चलबिचल
वीज, पाणी तोडण्याचे निर्देश

नाशिकमध्ये महिनाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील १,१८१ धोकादायक वाड्यांपैकी ४६७ वाडे तत्काळ रिकामे करणे आवश्यक आहे. परंतु, तेथे राहणाऱ्या नागरिकांना वारंवार नोटिसा देऊनही ते वाडे खाली करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वाड्यांची वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वत:हून घरे, वाडे रिकामी केले नाहीत, तर महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने घरे व इमारती खाली करण्यात येतील, असा थेट इशाराच प्रशासनाने दिला आहे.

विभागनिहाय स्थिती…
विभाग- धोकादायक घरे-वाडे

नाशिक पश्चिम- ६९०
पंचवटी – १७६
नाशिक पूर्व – १२७
नाशिकरोड – ७७
सातपूर – ६१
नवीन नाशिक – ५०
एकूण – ११८१

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Maharashtra Municipal Corporation Act 268nashik news todaynashik rainsअतिधोकादायक इमारतीताज्या बातम्यानाशिक मराठी बातम्यानाशिक महापालिका
Comments (0)
Add Comment