devendra fadnavis On Uddhav Thackeray: महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यावरून असे वाटत नाही की उद्धव ठाकरे हे त्यांचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये पाहता उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसावा, असे मला वाटत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
एका चॅनलच्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या स्पर्धेबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मध्यंतरी तीन दिवस दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्रीपदासाठी मविआने त्यांचा चेहरा पुढे करावा, हा त्यांचा प्रयत्न होता. एरवी आम्ही दिल्लीत गेलो की, ठाकरे आमच्यावर किती टीका करतात. किंबहुना आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढू दिला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या मनात होते की, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा चेहरा समोर ठेवून महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी. पण शरद पवार यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाहीत. काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही त्यांचीच री ओढली. मला असं वाटतं की, पवार साहेबांच्या डोक्यात मुख्यमंत्री कोणाला करायचं, हे जवळजवळ शिजतेय. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे सांगू शकतो. पण शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे, हे सांगणे फार कठीण आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे लीक झाला, असे बोलले जाते. पण सर्व्हे असे लीक होतात का? काँग्रेसने टेबलावर बसून हा सर्व्हे केला होता. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी काँग्रेसचा हा सर्व्हे लीक करण्यात आला, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली हे असं म्हणणार नाही, काळाची गरज होती, त्यामुळे काळाची गरज असताना संधी आली, तर सोडायची नसते असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.