Sindhudurg Akshay Sail Suicide : कोलगाव येथील व्यवसायाने इंजिनियर असलेला अक्षय साईल हा युवक मंगळवारपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह माडखोल धरणात सापडला
काय आहे प्रकरण?
अक्षय बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसात दाखल केली होती. याच दरम्यान बुधवारी सकाळी त्याची दुचाकी आणि चप्पल हे माडखोल धरण परिसरात दिसले. संशय वाढल्याने त्याचा शोध सुरू झाला. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. अक्षयच्या आत्महत्या प्रकरणातील सगळा धक्कादायक प्रकार समोर येताच कोलगाव सरपंच संतोष राऊळ व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले. यावेळी माजी आमदार राजन तेलीही उपस्थित होते.
मित्रांना शेवटचे “हाय” असा मेसेज
अक्षयने झालेल्या मारहाणीनंतर नैराश्यातून चिठ्ठी लिहिली आणि संशयितांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही चिठ्ठी पाठवली. तर काही मित्रांना शेवटचे “हाय” असा मॅसेज टाकून आपल्या मोबाईलवर संशयितांचे फोटो आणि त्यांनी केलेले चॅटिंग स्टेटसवर ठेवले. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा होत होती. काही जणांनी आपल्या परीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची गाडी धरण परिसरात आढळल्याने त्याचे मित्र व नातेवाईक यांचा धीर खचला .
पोलीस ठाणे घाटात स्थानिक ग्रामस्थांनी अक्षयच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून उशिरापर्यंत सुरू होती.
अक्षयची धरणात आत्महत्या, नऊ नावांची सुसाईड नोट स्टेटसवर, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश
धमकी देणाऱ्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश
गाडीच्या अपघातानंतर व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून अक्षयची आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग व मारहाण केल्यामुळे आपण जीवन प्रवास संपवत आहे, असे सांगून तब्बल ९ जणांच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीत केला आहे. यात कोलगाव येथील पाच जण व मुंबईमधील चार जणांचा समावेश आहे. सगळ्यात धक्कादायक असे की धमकी देणाऱ्यामध्ये मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
विम्याच्या पैशातून प्रकार
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार गाडीचा अपघात झाल्याच्या निमित्याने घडला आहे. मुंबईतील एका व्यक्तीची गाडी अन्य एकाला भाड्याला देण्यात आली होती. त्यात अक्षयाने मध्यस्थी केली होती. मात्र त्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर गाडीचा विमा देण्यासाठी विमा कंपनीने नकार दिला. त्यामुळे यातील तब्बल साडेआठ लाख रुपये हे अक्षय याच्याकडून वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता. त्यातील तीन लाख रुपये घेण्यात आले. अन्य रक्कमही देण्यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली. तसेच त्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर अक्षयने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.