Nashik Vidhan Sabha: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्टपासून राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पहिल्या टप्प्यात ठाकरेंनी मराठवाडा व विदर्भाचा दौरा केला. परंतु, गड असलेल्याने नाशिककडे मात्र पाठ फिरवल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक हा मनसेचा गड असतानाही आणि मनसेचे नाशिकमध्ये राज्यपातळीवरील अर्धा डझनपेक्षा अधिक नेते असूनही पक्षांतर्गत गटबाजीमुळे ठाकरेंनी नाशिककडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. मनसेने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानतंरही राज यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने मनसेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर महायुतीतील घटकपक्षांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा, तर दिंडोरीत भाजपचा पराभव झाला आहे. यासोबतच जिल्ह्यातील तीन मतदारसंघ धुळे लोकसभेत येत असून, या ठिकाणीही भाजपचे उमेदवार पराभूत होऊन काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वारे वाहत असतानाच महायुतीच्या नेत्यांनीही आता बांधबंदिस्ती सुरू केली आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांच्या दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडूनही खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकमध्ये येऊन जिल्ह्यातील मतदारसंघांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापाठोपाठ शरद पवार, जयंत पाटील, अनिल देसाई यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमधील १५ विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे मनसेचा गड असतानाही राज ठाकरेंनी नाशिककडे निवडणुकीच्या तोंडावर दुर्लक्ष केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यानतंर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्टपासून ते राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पहिल्या टप्प्यात ठाकरेंनी मराठवाडा व विदर्भाचा दौरा केला. परंतु, गड असलेल्याने नाशिककडे मात्र पाठ फिरवल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक ‘ऑप्शन’ला टाकण्याचा इशारा
एकेकाळी नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार, महापालिकेत सत्ता अशी स्थिती होती. परंतु, पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेला नाशिकमध्येच ओहोटी लागली. पक्षबांधणीसाठी नाशिकची जबाबदारी राज यांनी पुत्र अमित ठाकरेंवर सोपवली होती. मात्र, तरीही गटबाजी थांबत नसल्याने पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट केला. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी येऊन नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. पक्षात अनेक वेळा बदल झाले. परंतु, गटबाजी थांबत नाही. त्यामुळे गटबाजीचा वीट आला आहे. असे प्रकार बंद करा, नाहीतर मला नाशिक ‘ऑप्शन’ला टाकावे लागेल, असा इशारा त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर मार्चमध्ये एकदा आणि जूनमध्ये एकदा राज ठाकरेंनी नाशिकचा दौरा केला. परंतु, त्यानंतर नाशिककडे ते फिरकलेच नसल्याचे चित्र आहे.
मनसैनिकांत चलबिचल
विधानसभेपाठोपाठ नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्याही निवडणुका लागणार आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी मनसेची ताकद असून, विधानसभा मतदारसंघांसह महापालिका निवडणुका जिंकायच्या असतील, तर विधानसभा निवडणूक लढली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार ठाकरेंनी निवडणुकीची तयारी सुरू केली असली, तरी नाशिककडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या दुर्लक्षाचा अर्थ काय, असा प्रश्न आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे.