Madhya Vaitarna : मध्य वैतरणा धरणातून अचानक सोडलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती वाहून गेला आहे. तर एक मुलगी थोडक्यात बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा पर्यंत मध्य वैतरणा धरणातून पाणी विसर्ग करण्यात आला नव्हता. मात्र, शनिवार संध्याकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सुचना न देताच अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेला आहे. काही लोक संध्याकाळी कामाहून शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथे गावी परतत असतात. मात्र येथील धोकादायक पुलाच्या दुतर्फा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही.
दरम्यान सावर्डे पुल ओलांडून घरी जात असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. या पाण्याच्या प्रवाहातून भास्कर पाधीर आणि रुचिका पाधीर ही ७ वर्षाची चिमुकली असे दोघं पुलावरून बेसावधपणे जात होते. भास्कर पादीर यांनी सोबतच्या रुचिकाला प्रवाह वाढल्याने खांद्यावर उचलून घेतले. परंतु पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना तोल सांभाळता आला नाही. यातच ते वाहून गेले आहेत. अगदी शेवटच्या क्षणी काठावरील माणसांनी रुचिकाला हात देत सावरल्याने रुचिकाला सुखरूप बाहेर काढता आले आहे. मात्र भास्कर यांचा शोध उशीरा पर्यंत चालूच होता. दरम्यान गेल्या ३ वर्षातील ही ८ वी घटना आहे.