Jayant Patil Vidhan Sabha Election 2024 : दादांच्या मनातलं कळतं पण… ते काय करू शकतात याची माहिती आहे असं जयंत पाटील यांनी अजित पवारांबाबत उद्देशून म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
तुम्हाला पवारांच्या मानातलं जास्त कळतं असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता पाटील म्हणाले, ‘मोठ्या पवारांच्या मनातलं कळणं अवघड असतं, दादांच्या मनातलं कळतं पण मला बोलायचं नाही. मला माहित आहे ते काय करू शकतात आणि काय होणार आहे’. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘व्हिजन २०५०’ या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. त्यामुळे एकीकडे अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे संकेत आणि दुसरीकडे जयंत पाटील यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे लोक सुतकात आहेत
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीच्या आधीची ही वेळ आहे. एखाद्याला मतदान दिल्यावर हा कुठं जाईल सांगता येत ना, अशी सगळी परिस्थिती मतदाराच्या मनात आहे. भाजपचे लोक तर सुतकातचं आहेत त्यांना असं वाटतं. हे आले कुठून, १०५ वाले गप्प आहेत, ४०-५० आमदारावले राज्य करत आहेत ५० वाल्यांनी तर राज्यचं वेठीस धरलं आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे यावर देखील जयंत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. मराठ्यांना ओबीसीला आरक्षण देण्याबाबत सरकार आता निर्णय घेण्याच्या जवळ आहे. त्यामुळे आम्ही त्यात बोलत नाही. ओबीसी आणि मराठा आंदोलकांशी सरकार खाजगीत काही बोलत आहेत, ते आम्हाला माहित नाही म्हणून बोलत नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा आहे, पण तो लवकर घ्यावा. कारण त्यांची मुदत आता संपत चालली आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.
‘साहेबांच्या मनातलं कळणं अवघड, दादांच्या मनातलं कळतं पण बोलणार नाही’; जयंत पाटलांचा तिरकस विधान
अमित शहा – देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर
अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांमधे अंतर आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत आहे. बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत. जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे, असं म्हणतं जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर तोफ डागली आहे.