दादांनी पाठीत खंजीर खुपसला! मोठी डील झालीय! NCPच्या आमदाराचं खळबळजनक पत्र, पटेलांवर निशाणा

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी परवा प्रसिद्ध झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्जुनी-मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कापला. आता चंद्रिकापुरेंनी दादांच्या नावानं एक पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोंदिया: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बडोले यांना अर्जुनी-मोरगावमधून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्रिकापुरे यांनी पत्र लिहून त्यांची खदखद व्यक्त केली आहे. पत्रातून त्यांनी अजित पवार आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावर तोफ डागली आहे. चंद्रिकापुरे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

अजित पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप चंद्रिकापुरे यांनी पत्रातून केला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ता बोलतोय. आज माझं तिकीट कापण्यात आल्याचं समजलं. मुंबईत येऊनही रिकाम्या हातानं परत यावं लागलं, याचं मनापासून दुःख झालं आहे. दादा, जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला, तेव्हा इच्छा नसतानाही आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेऊन मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. केवळ, माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा हा विश्वासघात आहे,’ असं चंद्रिकापुरेंनी पत्रात म्हटलं आहे.
NCP Candidate List: ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव
‘मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, असं सांगत मी मतदारसंघातील गावं न गावं पिंजून काढली. जनतेला भेटून आपली भूमिका कशी बरोबर आहे, हे समजावलं. पण, ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटते हो. पण ज्या हातात खंजीर आहे, तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपाचा नेता प्रफुल पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहजच पटेल असं नक्कीच वाटत नाही, यात मोठी डील झालीय, अशीच चर्चा आता मतदारसंघात, जनतेत सुरू आहे,’ अशी खदखद तिकीट कापण्यात आलेल्या चंद्रिकापुरेंनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Election 2024: दोन्ही शिवसेनेची एकच मागणी; मविआ, महायुतीची कोंडी; ठाकरे, शिंदेंना नेमकं काय हवंय?
‘कालपर्यंत मी भाजपाचा निष्ठावंत, कट्टर म्हणणार नेता आज सुमडीत आपल्या पक्षात आला. नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असतात. पण दादा सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. म्हणूनच, आमच्या इथल्या नेत्याची सरड्यासारखी बदललेली भूमिका पाहून मला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेलासुद्धा वाईट वाटलं. मतदारसंघातील जनता हे विसरणार नाही आणि हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल. तुम्हाला कदाचित हे पटलं असेल, पण माझ्या लोकांना हे अजिबात ‘पटेल’ असं नाही. त्यामुळे याच निवडणुकीत याचा हिशोब होणार आणि जनताच सुफडासाफ करणार. कारण, आता मी जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार आहे, आता जनतेकडेच विधानसभेचं तिकीट मागणार आहे,’ असं म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

arjuni moregaon seatassembly electionsMaharashtra electionMaharashtra politicsअजित पवारप्रफुल्ल पटेलमनोहर चंद्रिकापुरेमहाराष्ट्र राजकीय बातम्याराजकुमार बडोलेराष्ट्रवादी काँग्रेस
Comments (0)
Add Comment