Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी आज गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. यात माजी आमदार के.पी. पाटील, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा समावेश होता.
काही ठिकाणी साधेपणाने तर काही ठिकाणी शक्ती प्रदर्शन
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जागा वाटपावरून रात्रंदिवस बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रत्येक पक्षात काही उमेदवार जाहीर झाले आहेत तर काही उमेदवार अद्याप जाहीर होणे बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत कालच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार के.पी. पाटील यांनी राधानगरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. तर माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वत:च्या शाहू आघाडीतर्फे अर्ज दाखल केला. तर करवीर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढणारे राहुल आवाडे यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे.
आवाडेंच इचलकरंजी शक्ती प्रदर्शन
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून आवाडे भाजपमध्ये आल्याने महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर आज मोठ्या उत्साहात शक्ती प्रदर्शन करत महायुती एकत्र आल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार असलेल्या राहुल आवाडे यांचं उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आला. सकाळी साडे दहाच्या सुमारास गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर राहुल आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी महात्मा गांधी पुतळा पासून रॅलीला सुरुवात केली. ही रॅली जनता बँक चौक, शिवतीर्थ मार्गे प्रांत कार्यालय येथे पोहोचली. यावेळी राहुल आवाडे यांच्यासोबत माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार शशिकला जोल्ले, खासदार धनंजय महाडिक, मोष्मी आवाडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर इचलकरंजी मध्ये शंभर टक्के भाजपचा विजय होणार असा विश्वास आहे त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.तसेच माझ्या प्रचारासाठी राज्य स्तरावरील सर्व मुख्य नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ हे प्रचाराला येतील असे ही ते म्हणाले आहेत.
के पी पाटलांनी भरला साधेपणाने अर्ज
कालच मातोश्रीवर मशाल हातात घेत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवलेले के पी पाटील यांनी आज पक्षाचा एबी फॉर्म घेऊन राधानगरी विधानसभा मतदारसंघात दाखल झाले. आणि अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने के पी पाटील यांना उमेदवारी मिळाली असून तगडी फाईट येथे होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर के पी पाटील यांनी मेळावा देखील घेतला.
यानंतर माध्यमांशी बोलताना, मी गेली अनेक वर्ष पुरोगामी विचार घेऊन आम्ही काम करत आलो आहे. पुढे देखील हेच विचार घेऊन काम करणार आहे. आघाडीतील सर्व नेत्यांना मी भेटून माझ्या उमेदवारीसाठी मी आग्रह केलं होता.यामुळे आघाडीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर एकमताने ही जबाबदारी सोपवली आहे. आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला गेल्याने मी ठाकरे गटात प्रवेश करून शिवसैनिक म्हणून काम करायचं ठरवलं आहे. गेली अनेक वर्ष केलेल्या कामाच चीझ झाल्याने आज माझी निवड झाली वाटत आहे. राज्यात जातीवादच जे संकट आहे ते मोडून काढण्याचं निर्धार आघाडीच्या नेत्यांनी केला असून लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने तसा जनादेश ही दिला आहे असे के पी पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकाचे डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे असे वक्तव्य कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना केले होते याला देखील केपी पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधक अजून देखील भ्रमात आहेत. त्यांना जनतेचे नाडी कळली नाही. लोक काय विचार करतात हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं वक्तव्य आहे. जनता त्यांना उद्याच्या 20 तारखेला मतपेटीतून उत्तर देईल असं देखील केपी पाटील म्हणाले आहेत.