Sanjay Raut Bail: ‘मीरा-भाईंदर शहरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभाल करण्याच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात किरीट व मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे’, असा जाहीर आरोप राऊत यांनी केला होता.
‘मीरा-भाइंदर शहरात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभाल करण्याच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात किरीट व मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे’, असा जाहीर आरोप राऊत यांनी केला होता. त्यामुळे मेधा यांनी अॅड. विवेकानंद गुप्ता यांच्यामार्फत भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० अन्वये राऊत यांच्याविरोधात बदनामीचा खटला भरला होता. त्या खटल्याच्या सुनावणीअंती २६ सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीश आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना दोषी ठरवले. तसेच त्यांना १५ दिवसांचा साधा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली. मात्र, त्यांना अपिल करता यावे म्हणून ती शिक्षा न्यायाधीशांनी ३० दिवसांसाठी स्थगित ठेवली होती. त्यानंतर राऊत यांनी त्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. या अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश संजीव पिंगळे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी संजय राऊत न्यायालयात उपस्थित होते.
‘राऊत यांच्या जामीन अर्जाला आमची हरकत नाही. मात्र, अपिल सुनावणीसाठी दाखल केले जाईपर्यंत जामीन मंजूर करू नये’, असे म्हणणे मेधा यांच्या वकिलांनी मांडले. तर अर्ज अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घ्यावा आणि शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर करावा, अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांचा अर्ज सुनावणीसाठी दाखल करून घेत तो अंतिम सुनावणीसाठी ३१ जानेवारी २०२५ रोजी ठेवला आणि जामीन मंजूर केला.