हायलाइट्स:
- अनलॉक सुरू झाल्यानंतर दिसू लागले परिणाम
- लग्नसोहळ्यांमध्ये लोकांची गर्दी वाढली
- नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये वधुवरांसह २५ जणांना बाधा
अहमदनगर: नव्या निकषांनुसार अहमदनगर जिल्हा करोना संसर्गाच्या दृष्टीने पहिल्या स्तरात आहे. त्यामुळे बहुतांश निर्बंध उठविण्यात आले आहेत. एवढे दिवस विवाह संमारंभावर असलेले निर्बंधही शिथील करण्यात आले असून शंभर जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका विवाह सभारंभात वधू-वरांसह तब्बल २५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवविवाहितांना थेट कोविड केअर सेंटरमध्येच दाखल होण्याची वेळ आली.
वाचा:‘मराठा आरक्षणाच्या लढ्यात चंद्रकांत पाटील केव्हा आले? त्यांचं योगदान काय?’
कणगर गावातील एका वस्तीवर दोन दिवसांपूर्वी विवाह सभारंभ आयोजित करण्यात आला होता. नवरदेव व नवरी हे याच गावातील आहेत. दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी वस्तीवरीलच होते. लग्नानंतर हळद फेडण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यावर करोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे लगेच देवळाली प्रवरा येथील सहारा कोविड सेंटरमध्ये नवरदेवाची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो करोना बाधित असल्याचे आढळून आले. नवरीलाही त्रास होत असल्याचे आढळून आल्यावर तिचीही चाचणी करण्यात आली. तिला संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्या दोघांनाही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
वाचा: नाशिकमधील निर्बंध कायम; पण लग्नसोहळ्याबाबत ‘हा’ दिलासा
लग्नासाठी मोठ्या संख्येने नातेवाई आलेले असल्याने सर्वांच्याच मनात शंका आली. सरपंच सर्जेराव घाडगे यांनी करोनामुक्त गाव मोहीम लक्षात घेऊन यासाठी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या मदतीने दोन्ही ठिकाणच्या वऱ्हाडी मंडळींच्या वस्त्यांवर रॅपीड अँटीजेन टेस्टचे शिबीर घेतले. लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. एक एक करता तब्बल २५ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. सुदैवाने सर्वांना सौम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे सर्वांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सरपंच घाडगे यांनी सांगितले, ‘हे सर्व बाधित रुग्ण वस्तीवर राहणारे आहेत. वस्ती मूळ गावापासून दूर आहे. शिवाय त्या रुग्णांना उपचारासाठी कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इतर गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मात्र, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.’
वाचा: जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं बळ; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य