Manoj Jarange Patil on Maratha Protest Ahead: मनोज जरांगे पाटील यांनी आज तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले आहेत. तर तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असे म्हणत पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.

जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी येथून पुढील आंदोलन मुंबई येथे होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सामुहिक उपोषण करण्यात येणार आहे. सरकार कुणाचे ही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, आरक्षणाची चळवळ काही थांबणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. जरांगे पाटील यांनी तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यासोबतच जरांगे पाटलांनी निवडणुकीतील रणनीतीबाबतही मोठे विधान केले आहे. ‘महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. निवडणुकीदरम्यान मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण जुळलं नाही, नाहीतर मराठ्यांनी सुपडासाफ केला असता. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या फॉर्मुल्यात नव्हतो.’ असे जरांगे पाटलांनी अधोरेखित केले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम, दलितांचे राजकीय समीकरण जुळवून उमेदवार देण्याचे ठरवले होते. परंतु या तिघांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे समीकरण अस्तित्वात आले नाही. तसेच जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितले की, एका समाजावर आमदार निवडून येत नाहीत. त्यांना इतर समाजाची सुद्धा साथ लागते. जर मराठा बरोबर मुस्लिम दलित एकत्र आले तर अनेक उमेदवार निवडून येऊ शकतात म्हणून समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते जुळले नसल्याने ऐनवेळी जरांगेंनी माघार घेतली.