Nana Patole on Markadwadi : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करुन मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम केला आहे.
Nana Patole : मारकडवाडीच्या धाडसाला सलाम, पण प्रशासन ब्रिटिशांसारखं वागतंय, नाना पटोले कडाडले, बिंग फुटेल म्हणून…
नाना पटोले यांचे ट्वीट काय?
मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम! विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, ३ डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले. मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून?
ईव्हीएमवरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे.
त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत!
माघार घेण्याचं कारण काय?
उत्तम जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली. गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर मतदानच करु देणार नसतील, आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली.