Mumbai Weather Update: सांताक्रूझ येथील कमाल तापमान डिसेंबरमधील गेल्या १६ वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमान होते तर कुलाबा येथील कमाल तापमान गेल्या १० वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते.
हायलाइट्स:
- आजही उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज
- रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता
- शनिवारनंतर पुन्हा थंडीचा अंदाज
मुंबईमध्ये येणाऱ्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने तापमानाचा पारा चढा आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईकरांना तापमानाचा ताप सहन करावा लागू शकतो, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. आज, गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधीसाठी दाखल होणाऱ्या मुंबईकरांनीही उन्हामध्ये काळजी घ्यावी याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवारी सकाळच्या सुमारास तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तसेच पुणे जिल्हा, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, साताऱ्याचा घाट परिसर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव येथे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन विरुद्ध दिशांकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मेघगर्जनांची शक्यता निर्माण होऊ शकते. उद्या, शुक्रवारी कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपासून पुन्हा एकदा थंडीचीही जाणीव होऊ शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.