World Soil Day 2024: शेतीची सुपिकता घटत असून, त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होत आहे. या मातीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज मृदा शास्त्रज्ञांनी अधोरेखित केली आहे.
अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष व पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनीही मृदेची दिवसेंदिवस झीज होत असल्याच्या संकटास दुजोरा दिला. खाडे म्हणाले, ‘नैसर्गिक प्रक्रियेतून मातीचा एक थर तयार होण्यासाठी सुमारे चार शतकांचा अवधी लागतो. पण अलीकडील वातावरणीय बदल आणि खंडित निसर्गचक्रामुळे बेमोसमी व ढगफुटीसदृश पावसासारख्या घटनांनी शेतातील माती वाहून जाते. शेतीचे बांधही पुसट होत चालल्याने ही माती सर्रास वाहून जाते. नाशिक जिल्ह्यात अलीकडील काळात काही ठिकाणी बेसुमार पावसाने थेट शेतजमीनच वाहून गेल्याच्या घटना घडल्या असून, त्या चिंता वाढवणाऱ्या आहेत.’
शेतजमिनींवरील माती पावसाने वाहून गेल्यानंतरचे अनुभव सांगताना शेतकरी मच्छिंद्र सानप म्हणाले, दुर्दैवाने अशी वेळ शेतकऱ्यावर आल्यानंतर डॅमेज कंट्रोल करताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरतात. परिणामी, मातीतील कार्बन निघून जातो. नापिकी वाढते व पिकांचा उत्पादन खर्चही वाढतो. अनेक ठिकाणी प्लॉटिंग किंवा इतर कारणांमुळे शेतातील मातीचेही मोठ्या प्रमाणावर उत्खनन व वाहतूक होते. यावर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
असे करा मातीचे रक्षण
शेतीच्या नांगरणीसाठी एसआरटीसारख्या नवीन पद्धतींचा अवलंब
नैसर्गिक वनांचे रक्षण
मुबलक प्रमाणात वृक्ष लागवड
बंधाऱ्यांच्या उभारणीतून मातीची धूप रोखणे
बांधकाम व खाणकामात मातीची धूप रोखणे
सातत्याने पीकबदल पद्धतीचा अवलंब करणे
शेतीतून माती वजा झाल्यास अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन सर्वच व्यवस्था ढासळेल. माती हा पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व असणारा घटक आहे. मातीच्या रक्षणासाठी शेतात बांधबंदिस्ती करून घेणे, रासायनिक खतांचा वापर घटविणे, पारंपरिक नांगरणीस एसआरटीसारखे शास्त्रीय संशोधनावर आधारित पर्याय शोधणे आदी मार्गांनी मृदेचे व पर्यायाने जीवसृष्टीचे रक्षण होईल. – सतीश खाडे, अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष व मृदा पाणी अभ्यासक