शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान– पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे दि. २ : शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल यांच्या शैक्षणिक कार्यातून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान मिळणार असून, या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणारी नवी पिढी घडेल, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

दोंडाईचा येथे श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर कुलगुरू डॉ. नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, नगरसेविका सुभद्रादेवी रावल आदी उपस्थित होते. पालकमंत्री रावल म्हणाले की, विद्यार्थी संस्था ही मुळातच शिक्षणासोबत स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणारी संस्था म्हणून स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडले असून, भविष्यातही हजारो विद्यार्थी घडतील. शिक्षणाचे आणि ज्ञानदानाचे हे अत्यंत मोठे कार्य आहे. जगात भारताला महासत्ता बनवायचे असेल, तर शिक्षण हा त्याचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित आणि महासत्ता राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पपूर्तीसाठी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.

सुमारे सहा लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या प्रस्तावित इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीचे भूमिपूजन होत असून, हा धुळे जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या संस्थेसाठी अडीचशे एकर जागा उपलब्ध आहे. सहकारमहर्षी दादासाहेब रावल यांनी सन १९५२ मध्ये ८० एकर जागा संस्थेला दान दिली. त्या काळातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज या संस्थेचा भक्कम पाया तयार झाला आहे.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने दादासाहेब रावल एज्युकेशन सिटी उभी राहिली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनली आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने शतकाहून अधिक काळ शिक्षणाबरोबरच राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची परंपरा जोपासली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले की, सन १९२१ मध्ये स्थापन झालेली ही संस्था शतकाहून अधिक काळ दुर्गम भागात शिक्षणाची अखंड ज्योत तेवत ठेवत आहे. विविध शाखांतील महाविद्यालयांचा समावेश असलेले हे शैक्षणिक संकुल दूरदृष्टीतून उभारले गेले असून, या भागात शिक्षणाचे प्रभावी जाळे निर्माण करण्यात संस्थेचे मोठे योगदान आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालयही या संकुलात कार्यरत आहे. तेथे शैक्षणिक, संशोधन आणि कृषीविषयक उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविले जात असल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले. या भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक संकुल अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले

००००

Source link

Comments (0)
Add Comment