‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, पण…’; भाजपची बोचरी टीका

हायलाइट्स:

  • भाजपची नाना पटोलेंसह राहुल गांधींवर टीका
  • मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरून लगावला टोला
  • अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत साधला निशाणा

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा देत आहेत. अशातच शनिवारी अकोल्यात बोलताना नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. पटोले यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही आता जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राहुलजींनाही पंतप्रधान व्हावसं वाटतंय. मात्र जनतेला असं अजिबातच वाटत नाही, भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे,’ असं ट्वीट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

नक्की काय म्हणाले होते नाना पटोले?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला इथं एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून गौरवलेल्या अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला बळकट करण्याविषयी भाष्य केलं. तसंच स्वत:ची मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली.

Vijay Wadettiwar: मोदींना भेटण्यास मी इच्छूक होतो, पण…; काँग्रेसच्या मंत्र्याची ‘मन की बात’

नाना पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेस

शेतकरी प्रश्नावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते भाजपमधून बाहेर पडले. काही दिवसांतच पटोले यांनी आपल्या स्वगृही अर्थातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजपला आव्हान दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा सत्तेत काम करण्यापेक्षा नाना पटोले यांनी संघटनेत रस दाखवला आणि त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली.

काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून नाना पटोले हे विरोधकांसह मित्रपक्षांबाबतही आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसंच २०२४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असं जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींपासून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनाही अंगावर घेणारे नाना पटोले आगामी काळात काँग्रेसला खरंच राजकीय यश मिळवून देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

Nana Patoleअतुल भातखळकरकाँग्रेसनाना पटोलेभाजप
Comments (0)
Add Comment