नाना पटोलेंचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

हायलाइट्स:

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यात
  • उद्धव ठाकरे यांच्या नाराजीवर दिली प्रतिक्रिया
  • केंद्र सरकारच्या कारभारावर कडाडून टीका

मुंबई: स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज काहीशी सबुरीची भूमिका घेतली. ‘काँग्रेस पक्ष हा पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेल. तसा शब्द खुद्द सोनिया गांधी यांनी दिला आहे,’ असं पटोले यांनी आज सांगितलं.

कोथरूड येथे नगरसेवक चंद्रकांत कदम यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन नाना पटोलेंच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. स्वबळाची भाषा आणि मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवल्यापासून महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. करोनाच्या संकटाच्या काळात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गंभीरपणे काम केलं पाहिजे. अशा परिस्थितीत कुणी स्वबळावर निवडणुका लढू असं म्हणत असेल तर लोक जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत,’ असं सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर काँग्रेसमध्येही स्वबळाच्या भूमिकेबाबत मतभेद असल्याचं पुढं आलं होतं.

वाचा: …त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका; संजय राऊतांचा घणाघात

या सगळ्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सावध मत व्यक्त केलं. ‘उ्द्धव ठाकरे हे काल मुख्यमंत्री नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलले. स्वबळाची भाषा शिवसेना सुद्धा करते. त्यामुळं मुख्यमंत्री नेमकं कोणाला उद्देशून बोलले हे कळलं तर त्यावर बोलता येईल,’ असं सांगून नाना पटोले यांनी अधिक बोलणं टाळलं.

‘दोन्ही दाढीवाल्यांचं दुकान बंद करायचं आहे’

पटोले यांनी यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ‘काँग्रेसनं साठ वर्षात केलेलं काम मोडीत काढण्याचं काम मोदी सरकारनं केलं. नोटाबंदी, जीएसटीनं देश देशोधडीला लागला. हजारो लोकांना रांगेतच मरावं लागलं. करोना काळात लोकांना घरात ठेवले आणि देश विकून टाकला. लसनिर्मितीचं काम खासगी कंपन्यांना दिलं. देशात लस न देता पुलवामावर हल्ला केलेल्या पाकिस्तानला दिली. केंद्रातल्या दोन्ही दाढीवाल्यांचं दुकान आपल्याला बंद करायचं आहे,’ असा टोला पटोले यांनी यावेळी हाणला.

वाचा: स्वबळाचं नंतर ठरवा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

Source link

maha vikas aghadiNana PatoleNana Patole in PuneNana Patole on Shiv Senaउद्धव ठाकरेकाँग्रेसनरेंद्र मोदीनाना पटोलेमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment