काँग्रेसची ‘स्वबळ एक्स्प्रेस’ नगरमध्ये सुस्साट! राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • पटोलेंच्या दिल्ली वारीनंतर काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला बळ
  • नगर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार
  • राष्ट्रवादी काँग्रेसवर केला गंभीर आरोप

अहमदनगर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर दिल्लीतील नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. पटोले यांच्या या घोषणेचे अहमदनगर शहर काँग्रेसतर्फे स्वागत करण्यात आले आहे. ‘आघाडी करताना जिंकणे शक्य असलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:कडे ठेवत असल्याने आतापर्यंत काँग्रेसचे नुकसानच होत आले आहे,’ असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. तसेच महापालिकेत आतापासूनच काँग्रेस विरोधकाची भूमिका बजावणार असून आगामी निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Congress Vs NCP in Ahmednagar)

दिल्लीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या समवेत राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे. पटोले यांच्या स्वबळाच्या सततच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भेट आणि त्यानंतरही पटोले यांनी कायम ठेवलेली भूमिका याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. त्याचेच पडसाद नगरमध्ये उमटले आहेत. नगरमध्ये गेल्या काही काळापासूनच काँग्रेसने उघडपणे विरोधाची भूमिका घेतली आहे. मधल्या काळात महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याचे सांगण्यात येत असले तरी काँग्रेसने मात्र आपण त्यामध्ये सहभागी नसल्याचे म्हटले आहे. नगर मनपामध्ये काँग्रेस सत्तेत आहे की विरोधात, या प्रश्नाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी “माहिती घेऊन सांगतो” असे उत्तर दिले होते. त्यावर नगर शहर काँग्रेसच्या भूमिकेला थोरात यांचीही हरकत नसल्याचे दिसून येते. यानंतर नागरी प्रश्नांवरून शहरात मनपा सत्ताधारी विरुद्ध शहर जिल्हा काँग्रेस असे चित्र रंगलेले पाहायला मिळत आहे.

वाचा:‘पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर; त्याचे खरे बाप देशातच!

या पार्श्वभूमीवर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, ‘यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिलेली आहे. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा मतदार आहे त्याच प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा देखील मतदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राष्ट्रवादीला कायमच फायदा झाला आहे. मात्र यातून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. दर वेळच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी म्हणून निवडून येऊ शकणार्‍या जवळपास सर्वच जागा या राष्ट्रवादी आपल्या पदरात पाडून घेते आणि इतर पक्षांचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागांमध्ये काँग्रेससाठी जागा सोडल्या जातात. यामुळे काँग्रेसच्या ताकदीचा उपयोग राष्ट्रवादीला झाला. मात्र राष्ट्रवादीचा काँग्रेसला कोणताही फायदा झाला नाही. उलटपक्षी काँग्रेसचे खच्चीकरण झाले, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच आमची मनपातील संख्या ही कमी राहिली. सध्याची शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेस या सर्वपक्षीय सहमती एक्सप्रेसचा भाग नाही. अनेक चांगले आणि वजनदार चेहरे काँग्रेस पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. निवडणुका अद्याप दूर असल्या तरीही त्या डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही संघटनात्मक बांधणीसाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागलो आहोत. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळाची भावना थोरात यांच्यासमोर योग्य वेळी मांडली जाईल. शेवटी अंतिम निर्णय हा त्यांचाच असेल,’ असेही काळे यांनी स्पष्ट केले.

वाचा: नांदेडमध्ये गँगवॉर! आधी गोळीबार, मग तलवारीचे वार करून एकाचा खून

Source link

ahmednagar congressAhmednagar Municipal Corporationअहमदनगरअहमदनगर महापालिकानाना पटोलेबाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँग्रेस
Comments (0)
Add Comment