कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात; NDRF च्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवले

हायलाइट्स:

  • कोल्हापूर जिल्ह्याची महापुराशी झुंड सुरूच
  • घराघरांमध्ये शिरले पाणी, अनेक मार्ग बंद
  • एनडीआरएफच्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवले

म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा महापुराच्या (Kolhapur Flood) विळख्यात सापडला असून पुणे ते बेंगळुरू हायवेसह जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. सकाळी महापुरात वाहून जाणाऱ्या ३६ जणांना एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने सुखरूप वाचवले. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरात पाणी घुसू लागल्याने स्थलांतराला वेग आला आहे. पन्हाळ्याला जाणारा रस्ता खचला असून चिखली गावात पुराचे पाणी घुसले आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका वाढला आहे. दरम्यान पंचगंगा नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून तब्बल ४९ फुटांवरून वाहत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २४ तास सलग पाऊस कोसळत आहे. पंचगंगेसह सर्व नद्यांना महापूर आल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी घुसत आहे. काल दोन दोघेजण वाहून गेल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफसह स्थानिक प्रशासन लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज सकाळी दोन ठिकाणी घडलेल्या घटनेत ३६ जणांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवले.

वाचा: कोकण रेल्वेवरील एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले; अनेक ट्रेन रद्द

कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडी जवळ पाण्यात अडकली होती. बसमधील पुरुष, महिला व लहान मुले अशा एकूण २५ लोकांना बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना यश आले आहे. ही बस पाण्यात बुडाली. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे पांगीरे येथे पुलावर नाशिक येथे निघालेली प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर अडकली होती. यात ११ लोक अडकले होते, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सांगली-कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी आले असून पुलावर चार फूट पाणी आले. बॅरिगेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली आहे.

Live : महाडमध्ये पुरात अडकलेल्यांनी घराच्या छतावर यावं, जिल्ह्याधिकाऱ्यांचं आवाहन

पालकमंत्री सतेज पाटील यांकोलनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन संबंधित सर्व यंत्रणांना पूरग्रस्त भागात व्यक्तिशः पोहोचून मदतकार्य देण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्री महोदय रात्रभर अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नागरिकांचे स्थलांतर व मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही पूरपरिस्थितीच्या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या असून मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोल्हापूर-पनाळा रस्ता खचला

जिल्ह्यात पुराने बाधित भागातील नागरिक व जनावरांना बाहेर काढणे, त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे व आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे काम एनडीआरएफच्या टीम व प्रशासनाच्या वतीने रात्रभर सुरू आहे. पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पंचगंगा नदीचे पाणी सध्या तब्बल ४९ फुटावरून वाहत आहे यामुळे पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा: कृष्णा नदीचं पाणी अचानक वाढलं, ‘या’ दोन जिल्ह्यांना पुराचा धोका

गारगोटीकडून गडहिंग्लज कडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट याठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झालेला आहे.
डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत. गारगोटी-कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी-कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे. यमगर्णी व निपाणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने पुणे बेंगलोर हायवे बंद झाला आहे.

Source link

kolhapur floodndrfPanchganga riverकोल्हापूरकोल्हापूर पाऊसपंचगंगा
Comments (0)
Add Comment