धुळे दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकची महाराष्ट्रात देखील घुसखोरी होत असून नागपूर येथील विमानतळावर लागलेल्या बॅनरवरून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे अंतर्यामी आहेत ते काहीही बोलू शकतात, आमच्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान महत्त्वाचे असून टाचणीभर देखील जागा कुणालाही देणार नाही. यासाठी शिंदे व फडणवीसांचे सक्षम सरकार आहे. ज्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, महाराष्ट्राची काळजी करण्यासाठी महाराष्ट्राच सरकार खंबीर आहे, असेही चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरून केलेल्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी, मी प्रवासात असल्यामुळे कोण काय बोलले आहे याची मला माहिती नाही. त्यामुळे ज्या गोष्टीची माहिती नाही त्यावर बोलणं उचित नसल्याचे म्हणत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याचबरोबर मी हे पूर्ण ऐकले नाही. परंतु प्रसाद लाड यांनी त्यामागची भूमिका देखील स्पष्टपणे बोलून दाखविले असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बराच वेळा केलेल्या विधानाचा विपर्यास केला जातो, असे देखील चित्रा वाघ यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळेल का, यावर बोलतांना चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, एक नको तर मी तर म्हणते दोन तीन महिला ह्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला पाहिजेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये चांगल्या सक्षम अशा आमच्या आमदार आहेत त्या मंत्री म्हणून काम करताना दिसतील, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री महिला असेल या वक्तव्यावर देखील चित्रा वाघ यांनी धुळ्यात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची आपली हौस फिटवून घेतली. त्यानंतर त्यांना आता महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
सरकार पडणार व मध्यवर्ती निवडणुका लागणार हे वारंवार भविष्य वर्तवणाऱ्या विरोधकांवरही वाघ यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची ट्यूशन घ्यावी असे म्हणत, अजित पवार यांनी यापूर्वीच कुठल्याही मध्यवर्ती निवडणुका लागणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर देखील, अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहे.