Yuvasena: वरुण सरदेसाईंनी तेव्हा युवासेनेची पडझड थोपवून धरली, पण अखेर एक चिरा ढळलाच

Authored by अभिजित दराडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Dec 2022, 9:23 am

Maharashtra Political crisis | शर्मिला येवले यांच्या राजीनाम्यामुळे युवासेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात युवासेनेची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. या सगळ्याची गंभीर दखल घेत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे पुण्यातील पक्षसंघटनेत काही बदल करणार का, हेदेखील पाहावे लागेल. शर्मिला येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे गटाची चिंता वाढू शकते.

 

वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे

हायलाइट्स:

  • येवले लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता
  • पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचा आरोप
  • शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव होत्या.
पुणे: ठाकरे गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना आता युवासेनेतही मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. विशेषत: पुण्यातील युवासेनेत मोठा असंतोष आहे. काही दिवसांपूर्वीच याचे पडसाद उमटले होते. परंतु, तेव्हा युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी पझडड कशीबशी थोपवून धरली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुण्यात शर्मिला येवले यांच्या रुपाने युवासेनेला खिंडार पडले आहे. शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव असून त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे सांगत येवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता शर्मिला येवले यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येवले लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास येवले यांचा राजीनाम्यानंतर पुण्यातील युवासेनेचे आणखी काही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत, मुंबईतील दिग्गज नेत्याच्या कन्येची युवासेना कार्यकारिणीत नियुक्ती
काही दिवसांपूर्वीच युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व महिला पदाधिकारी मुंबईतील शिवसेना भवनात गेल्या होत्या. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी या सर्व महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली होती. वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही सांगितलेल्या अडचणींवर उपाय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले होते. त्यावेळी हा वाद शमला असे वाटत होते. परंतु, आता शर्मिला येवले यांनी राजीनामा दिल्याने युवासेनेतील खदखद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमका काय मार्ग काढणार हे बघावे लागेल. या सगळ्याची गंभीर दखल घेत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे पुण्यातील पक्षसंघटनेत काही बदल करणार का, हेदेखील पाहावे लागेल. तसेच शर्मिला येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते ठाकरे गटाच्या युवासेनेतील कोणत्या नेत्यांना लक्ष्य करणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिंदे गटाच्या युवासेनेत घराणेशाही; सरवणकर, सुर्वे, भुसे, खोतकरांच्या मुलांची वर्णी

वरुण सरदेसाई संकटमोचकाच्या भूमिकेत,पण…

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. तेव्हादेखील वरुण सरदेसाई यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढली होती. तुम्ही कामाला लागा. निश्चितपणे युवासेना आगामी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास दिल्यानंतर युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य संपले होते. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील ३५ नाराज महिला पदाधिकाऱ्यांची यशस्वीपणे समजूत काढली होती. त्यामुळे वरुण सरदेसाई हे ठाकरे गटासाठी एकप्रकारे संकटमोचक ठरताना दिसत होते. मात्र, शर्मिला येवले यांच्या राजीनाम्याने त्यांचा हा आनंद तात्कालिक असल्याचे दिसून आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

maharashtra political crisispune local newssharmila yewaleuddhav thackeray campVarun SardesaiYuvasenaशर्मिला येवले राजीनामा
Comments (0)
Add Comment