महाविकास आघाडी सरकारने निर्भया पथकासाठी एकूण २२० वाहने खरेदी केली होती. मात्र ती वाहने त्यासाठी न वापरता त्यातील १२१ वाहने मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आली. तर ९९ वाहने इतर विभागांसाठी देण्यात आली. आता तेच लोक शिंदे-फडणवीस सरकारच्या नावाने बोंब मारताना दिसत आहेत. याचा अर्थ ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असाच झाला अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, जी ९९ वाहने पोलीस ठाण्यांना देण्यात आली होती, त्यांपैकी ९ वाहने ही मंत्र्यांच्या ताफ्यात देण्यात आली. ही सर्व वाहने खरे तर महिलांच्याच सुरक्षेसाठी वापरणे बंधनकारक होते, तहीही असे करण्यात आले. इतकेच नाही, तर यातील १२ गाड्या या अतिमहत्त्वाच्या ताफ्यातही देण्यात आल्या. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्यावेळेचे मंत्री छगन भुजबळ, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार, खासदार सुनील तटकरे आणि सुनील केदारे यांचा समावेश होता.
या बरोबरच निर्भया निधीतून ही ९९ वाहने जलद प्रतिसाद, लाचलुचत विभाग, मोटार विभाग आणि मंत्र्यांच्या ताफ्यांसाठी देण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्याही ताफ्यात एकूण १७ गाड्या देण्यात आल्या, असेही वाघ म्हणाल्या.
विधानसभेच्या २८८ पैकी २०० जागा जिंकू- वाघ
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ४५ आणि विधानसभेला २८८ पैकी २०० जागा जिंकू असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने मला प्रदेश महिला अध्यक्षाची जबाबदारी दिल्यापासून मी महाराष्ट्र दौरा करत असून हा माझा शेवटचा टप्पा आहे. महिला सुरक्षा हा आमचा अजेंडा आहे, असे वाघ म्हणाल्या. तसेच भाजपचे नेते हेकडी नाहीत. भाजप मध्ये सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले जातात. चांगला सल्ला असेल तर स्वीकारतात अशी प्रतिक्रिया देखील वाघ यांनी राज ठाकरे यांनी शाईफेक प्रकरणानंतर लिहिलेल्या पत्रावर दिली.