आरोग्यमंत्री म्हणतात, करोना राज्यातून हद्दपार; नाताळ, नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करा

म.टा. प्रतिनिधी, मुंबई/पुणेः जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘महाराष्ट्रातून करोना हद्दपार झाला असून, राज्यात केवळ १३२ करोना रुग्ण आहेत. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीच कारण नाही’, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या जुन्या यंत्रणेची तपासणी करण्यासाठी येत्या मंगळवारी मॉकड्रिल होणार आहे. संभाव्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा तयार आहे का, हे तपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांना आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. एकीकडे करोना हद्दपार झाल्याचे म्हणत असताना, ‘करोनाचे संकट पुन्हा घोंगावत असताना नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःहून बंधने पाळावीत. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. बंधने पाळून सण-उत्सव साजरे करावेत’, असेही त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले. राज्यातील ९५ टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत; शिवाय ६० ते ७० टक्के नागरिकांनी ‘बूस्टर मात्रा’ घेतल्या आहेत. लसीकरणामुळे नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. प्रत्येकाने स्वतःहून काही बंधने पाळणे आवश्यक आहे’, असे सावंत यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांचे आरोग्यकार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस पहिले सरकार असल्याचा दावा करून सावंत म्हणाले, ‘सरकारने साडेतीन कोटी महिलांचा ‘आरोग्य डेटा’ तयार केला आहे. आता नर्सरी ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचे आणि नंतर राज्यातील सर्व पुरुषांचा ‘आरोग्य डेटा’ तयार केला जाणार आहे. डेटा करून सरकार थांबणार नाही. प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासण्या व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.’

Source link

Coronavirus In Indiacoronavirus in maharashtratanaji sawanttanaji sawant on coronavirusतानाजी सावंत
Comments (0)
Add Comment