अजित पवारांचा हल्ला, राजीनाम्यासाठी विरोधकांची चहुबाजूंनी कोंडी, सत्तारांचं दोन ओळीत उत्तर

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपाचे प्रकरण बाहेर काढले. ‘गायरान जमिनीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे निर्णय समोर असताना, सत्तार यांनी योगेश खंदारे नावाच्या व्यक्तीला फायदा मिळवून दिला असून, हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी अजित पवार यांनी सोमवारी सभागृहात केली. विरोधकांनी सबसे बडा गद्दार-अब्दुल सत्तार… सत्तारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. या साऱ्या प्रकारावर काल दिवसभरापासून गायब असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन ओळीत प्रतिक्रिया दिली.

माझ्यावर विधानसभेत आरोप झाले आहेत. त्यामुळे माझ्यावरील आरोपांचं उत्तर मी सभागृहातच देईन, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन काल विधानसभा आणि विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला. जोरदार गदारोळानंतर दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. काल दिवसभर सत्तार प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. रात्री पत्रकारांनी अब्दुल सत्तार यांना गाठल्यावर त्यांच्या प्रश्नांना टाळत मी सभागृहात उत्तर देईन, असं म्हणून त्यांनी वेळ मारुन नेली.

‘गायरान’वरुन विरोधकानी रान उठवलं

वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर ४४ मधील ३७ एकर १९ गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा १५० कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्याचे पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदा निधी

कृषिमंत्री या नात्याने अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात एक ते १० जानेवारी या कालावधीत सिल्लोड कृषी प्रदर्शन आयोजित केले असून त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. त्यानंतर, सिल्लोड कृषी महोत्सवाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, कुठे गैरप्रकार घडला असेल, तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मात्र, या आश्वासनावर संतप्त होत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेत सत्तार, तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या गोंधळात सरकारने स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठ अधिनियम सुधारणा आणि महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती तसेच निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती त्या संदर्भातील विधेयके मंजूर करून घेतली.

Source link

Abdul Sattarabdul sattar resignajit pawargairan landgrazing landअजित पवारअब्दुल सत्तारअब्दुल सत्तार राजीनामागायरान जमीन
Comments (0)
Add Comment