‘उसकी हार के चर्चे जीत से ज्यादा हैं’; पराभवानंतरही सोशल मीडियावर सिकंदरचीच चर्चा

पुणे : पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सर्वात चर्चेत ठरला तो म्हणजे पैलवान सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख पराभूत झाला असला तरी सोशल मीडियावर चर्चा फक्त त्याच्याच नावाची सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याची कुस्ती खेळण्याची पद्धत आणि त्याची शरीरयष्टी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. मात्र उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडकडून सिकंदर शेखचा पराभव झाला. बाहेरची टांग या डावावरती महेंद्र गायकवाडला चार गुण पंचांकडून देण्यात आले आणि सिकंदरला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कालपासून सोशल मीडियावर सिकंदरच्या बाजूने चर्चा सुरू आहे.

स्वतः पैलवान असलेल्या पण पैलवानकी करू न शकलेल्या सिकंदरच्या वडिलांनी हमाली करून सिकंदरला पैलवान म्हणून घडवले आहे. उत्तर भारतातही सिकंदर लोकप्रिय झाला असून ‘टायगर ऑफ महाराष्ट्र’ म्हणून तो ओळखला जातो. उपांत्य फेरीत सिकंदर शेखला पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर सोशल मीडियात सिंकदरच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे.

‘सिकंदर उपांत्य फेरीत पराभूत झाला, मात्र त्याने लोकांची मनं जिंकली’, अशा आशयाच्या पोस्ट लिहीत सोशल मीडियात सिकंदर शेखच्या खेळाचं कौतुक केलं जात आहे. तसंच ‘यंदा सिकंदर पराभूत झाला असला तरी भविष्यात तो महाराष्ट्र केसरीचं मैदान नक्कीच गाजवणार’ असा विश्वासही लोकांकडून व्यक्त केला जात आहे.

सर्वसामान्य लोकांसह काही राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तींनीही महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सिकंदरच्या पराभवावर भाष्य केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत फेसबुकवर सूचक पोस्ट लिहिली आहे. ‘हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है,’ अशा कॅप्शनसह अंधारे यांनी सिकंदर शेखचा फोटो शेअर केला आहे.

संघर्षवीर सिकंदर शेखचा खडतर प्रवास

लाल मातीचं मैदान गाजवणाऱ्या सिकंदर शेखचा इथपर्यंतचा प्रवास प्रचंड खडतर राहिला आहे. सिकंदरचे वडील रशीद शेख यांना देखील कुस्तीचा भारी नाद, मात्र घरी अठरा विश्व दारिद्र्य. त्यामुळे रशीद हे निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील तो खाऊन सराव करायचे. कुस्तीतून जिंकलेल्या इनामावर संसाराचा गाडा हाकणे सुरु होते. पुढे त्यांना सिकंदर आणि हुसेन ही दोन मुलं झाली. त्यामुळे दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत झाली. त्यामुळे त्यांनी मार्केट कमिटीत हमालीचे काम सुरु केले. संसार चालवण्यासाठी दिवसभर हमाली करायची तेव्हा कुठे रात्री चूल पेटायची अशा अवस्थेत कुस्तीचा नाद काही केल्या सुटत नव्हता. हमाली करून दिवसभर थकलेले रशीद रात्री लहानग्या सिकंदर आणि हुसेनला घेऊन थेट आखाडा गाठायचे अन् कुस्तीचे धडे शिकवायचे. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते.

दरम्यान, यातूनच घडलेला सिकंदर हळूहळू जोरदार कुस्त्या मारायला लागला होता. पण संघर्ष लहानपणापासूनच पाचवीला पुजलेल्या सिकंदरच्या रस्त्यात काटे होतेच. सराव सुरु असतानाच सिकंदरचे वडील रशीद यांना आजाराने ग्रासले. त्यामुळे त्यांना हमाली सोडावी लागली. पुन्हा सिकंदराच्या खुराकाची अडचण झाली. पण आपला भाऊ कुस्तीत नाव मोठं करणार याची खात्री असलेल्या मोठा भाऊ हुसेनने वडिलांच्या हमालीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतलं. वडिलांना शक्य न झालेलं स्वप्न घेऊन उराशी बाळगून सिकंदरने आपली घोडदौड सुरूच ठेवली. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो कुस्तीचे डावपेच शिकत होता. पुढे सिकंदरने अनेक मोठ्या कुस्त्या जिंकल्या आणि अलिकडेच तो भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्य दलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. सिकंदरच्या याच लढाऊ वृत्तीला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकंही सलाम करताना पाहायला मिळत आहेत.

Source link

maharashtra kesari newspune news todaysikandar shaikh newsपुणे ताज्या बातम्यामहाराष्ट्र केसरीसिकंदर शेख
Comments (0)
Add Comment