सर्वधर्मसमभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. कुठल्या जातीधर्मातील लोकांशी त्यांनी भेदभाव केला नाही. आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या दृष्टीकोनाने बोलतात. पण छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनीही कधी कुठल्या धर्माचा अनादर केला नाही, त्यामुळे यावरून कुठलाही वाद निर्माण करू नये, असं खासदार उदयनराजे म्हणाले.
त्यावेळी त्यांनी मंदिरांसोबत मशिदीही बांधल्या. साताऱ्यात शाही मशिदीची देखरेख आजही आमच्या कुटुंबाकडून होते. छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे दोघंही स्वराज्यरक्षक होते. त्यांनी सगळ्या धर्मांचा आदर केला म्हणून धर्मरक्षकही होते, असं उदयनराजे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना, संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले होते. यानंतर भाजप नेत्यांनी तात्काळ अजित पवार यांच्याविरोधात रान उठवले. ‘संभाजी महाराज हे धर्मवीरच होते, त्यांनी धर्मासाठीच बलिदान दिले’ असे सांगत भाजपने अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये हेलिकॉप्टर लँड, राज ठाकरे उतरले, पळशी गावात हुरडा पार्टीत सहभाग
‘अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्यरक्षक होतेच पण ते धर्मवीर देखील होते हे लक्षात ठेवावे’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
हेही वाचा : जेसीबीतून फुलांची उधळणं, क्रेनमध्ये ३२ फुटाचा हार; ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं जंगी स्वागत