हायलाइट्स:
- ‘पूरग्रस्तांच्या मदतीला येण्याची इच्छा होती पण राज ठाकरे म्हणाले…’
- ‘…म्हणून राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबियांनी पहिल्या दिवशी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं’
- शर्मिला ठाकरेंनी केला उलगडा
मुंबई : एका आठवड्याच्या पावसाने राज्यात अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं. इथे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अख्खी घरच्या घरं पाण्याखाली गेल्यामुळे लोकांना जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदतकार्यही सुरू आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पूर आल्याच्या पहिल्याच दिवशी मला तिथे जाऊन मदत देण्याची इच्छा होती, पण ते का शक्य झालं नाही, याचाही उलगडा त्यांनी केला आहे.
पूर आल्याच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याचं टाळलं. कारण, राज ठाकरे यांनी आधी पुरग्रस्तांना मदत पोहोचवावी असं सांगितलं होतं. त्यामुळे मी उशिरा येत असल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आलो असतो तर मदतकार्यात अडथळे आले असते. त्यामुळे तेव्हा येणं टाळल्याचं त्या म्हणाल्या. इतकंच नाहीतर मनसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम उभी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
पूरग्रस्तांसाठी मनसेकडून मदत सुरू आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक मनसेकडून पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. दरम्यान, महापूरात लोकांच्या कागदपत्रांपासून ते घरातील सर्व सामान वाहून गेलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पण मनसे कार्यकर्ते मदत पाठवण्याचं काम करत आहेत. मनसेची मदत पोहोचली असल्याची माहिती तिथल्या पोलिसांकडूनही सांगण्यात आल्याचं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
खरंतर, आयुष्याची सगळी जमापुंजी वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले आहेत. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी यामुळे झालेल्या नुकसानीने डोळ्यांतलं पाणी काही थांबणार नाही. अशात सध्या मोठ्या प्रमाणात मदतकार्यही सुरू आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.