‘बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला, तरी पुढील काळात लहान मुलांना चित्रफीतीद्वारे (व्हिडिओ) शिक्षण देण्याची सुविधा करण्यात येत आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली.
‘बालभारती’च्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केसरकर बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. या वेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आपल्या जीवनात ‘बालभारती’चे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्त्व आहे. ‘बालभारती’चे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळातील अधिकाधिक शिक्षण मातृभाषेतून उपलब्ध होणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षांत भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून, विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ट काम करावे,’ असे केसरकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातील भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. ‘मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल. दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे,’ अशा शब्दांत केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.