अनेक पालकांना आपले पाल्य सरकारी शाळेमध्ये पाठविणे हे कमीपणाचे वाटते. पण अशीही एक सरकारी शाळा आहे जिथे प्रवेशासाठी पालकांची रांग लागते. यामागचे कारणही तसेच आहे. या शाळेतून शिकणारा प्रत्येक तिसरा विद्यार्थी शासकीय सेवेत आहे. शिक्षणाच्या बाबतीत या शाळेने मोठ्या शाळांना मागे टाकले आहे. ही शाळा राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोडा गावात आहे. ही सरकारी उच्च माध्यमिक शाळा खासगी शाळांच्या सोयीसुविधांवर मात करत आहे. त्यामुळेच तेरा गावातील सातशे मुले येथे शिक्षण घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे येथून शिकणारे साधारण ६९३ विद्यार्थी सरकारी नोकरीत आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत असा विक्रम जिल्ह्यातील एकाही शाळेने केलेला नाही. त्यामुळेच या शाळेचा राज्यस्तरावरही गौरव झाला आहे. २००३ मध्ये ही शाळा उच्च माध्यमिक शाळा झाली. त्यानंतर २० वर्षे झाली तरी या शाळेतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. या शाळेत कला आणि विज्ञान शाखेचे वर्ग सुरू आहेत. त्याचबरोबर शाळेतील मुलांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, विज्ञान स्पर्धेत राज्यस्तरावर पदके मिळवली आहेत.
या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. एखादे मूल शाळेत गैरहजर राहिल्यास त्याच्या पालकांना लगेच कळवले जाते. यामुळेच या शाळेने शिस्तीच्या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या सगळ्याशिवाय शाळेच्या नावावर असा अनोखा विक्रम आहे, जो फार कमी शाळांकडे आहे. २००५ पासून येथे १८६९ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. ज्यामध्ये प्रत्येक तिसरा विद्यार्थी शासकीय सेवेत आहे. आतापर्यंत येथील ६९३ विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत. यापैकी आरएएस, पीटीआय, शिक्षक बनून पोलीस विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत.