पंडितजींच्या आठवणींना उजाळा देताना लतादीदींनी त्यांच्या काही काही किस्से शेअर केले होते. लतादीदी पंडितजींना अण्णा अशी हाक मारायच्या.
खुद्द लतादीदींनी सांगितलेला हा किस्सा त्यांच्याच शब्दांत…
पंडितजींना मी अण्णा म्हणत असे. अण्णांबरोबर गाण्यासाठी मला संगीतकार श्रीनिवास खळेंनी बोलवून घेतलं. मी तेव्हा अक्षरश: घाबरून गेले होते. इतक्या मोठ्या उंचीच्या गायकाबरोबर गायचं या कल्पनेने माझे हातपाय कापत होते. मी खळेंना सांगितलं, कुठे मी आणि कुठे पंडितजी? तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी घ्या. पण . मीच गायला हवं, असा हट्ट खळेंनी धरला. माझी भीती काही जाईना. मग मी अण्णांनाच भेटले आणि त्यांना माझी अवस्था सांगितली.
अण्णा म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. कोणाबरोबर गाते आहेस, हे मनातही आणू नकोस. तरीही गायला सुरुवात करताना मनात भीती होतीच. पण पुढे इतकं सोपं वाटायला लागलं की मी किशोर, रफी यांच्याबरोबर ज्या सहजतेने गायचे तशीच गायला लागले. हे केवळ अण्णांच्या त्या वागणुकीमुळंच शक्य झालं. इतका हा विलक्षण माणूस की, मला माझे वडीलच मिळाल्यासारखं वाटलं.
दीदींनी सांगितलेला आणखी एक किस्सा…
एकदा ते मुंबईत आले असताना मला अचानक फोन आला, ‘लता आज मी तुझ्या घरी येऊन जेवणार आहे. काय करशील?’ मी विचारात पडले, एवढा मोठा माणूस घरी येतो आहे. त्याच्यासाठी काय जेवण करावं? मग तेच फोनवरून बोलले, ‘तू घाबरली असशील. मला जास्त काही नको. फक्त श्रीखंड-पुरी कर.’ ते घरी आले. जेवले आणि नंतर गात बसले,असा एक किस्सा दीदींनी सांगितला होता. त्यांची गायकी थोर होतीच, तिच्याबद्दल सगळेच सांगतील. पण ते माणूस म्हणूनही तितकेच थोर होते, याचा अनुभव मी घेतलाय, असंही लतादीदी तेव्हा म्हणाल्या होत्या.