‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणं योग्यच, मालकी हक्क दाखवला तर असंच होणार’

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अदानी समूहानं विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच ‘अदानी एअरपोर्ट’ असा फलक लावला होता. संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी हा फलक उखडून फेकला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या या कृत्याचं समर्थन केलं आहे.

संसद अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘शिवसैनिकांनी चुकीचं काहीही केलेलं नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,’ असं ते म्हणाले. ‘कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल तर शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झालं तेच पुढंही होत राहणार, असं राऊत यांनी ठणकावलं.

वाचा: ‘बाबासाहेब पुरंदरेंनी केलेली इतिहासाची मांडणी चुकीची आहे, पण…’

आर्थिक संकटात सापडलेल्या जीव्हीके समूहाकडून अलीकडंच अदानी समूहानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडं घेतला आहे. त्याचबरोबर, नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाचा ताबाही ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’ (AAHL) कडं गेला आहे. त्यानंतर तिथं अनेक बदल केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘अदानी एअरपोर्ट’ असा नामफलक लावण्यात आला होता. वास्तविक हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं. असं असतानाही तिथं अदानींचा फलक लागल्यानं शिवसैनिक संतापले. त्यातून हा फलक हटवण्यात आला होता.

अदानी समूहाचा खुलासा

अदानी समूहाकडून यावर खुलासाही करण्यात आला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे ब्रँडिंग भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे निकष व मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आलं आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ पूर्वीच्या कंपनीच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगनं घेतली आहे,’ असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

वाचा: ‘लोकल बंद ठेवलीत, आता लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या’

Source link

Adanai Airport BrandingSanjay RautSanjay Raut Comment on Adani Airport Brandingअदानी एअरपोर्टसंजय राऊत
Comments (0)
Add Comment