यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात मन रमत नसल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देतानाही शरद पवार यांनी कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून गेले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही. पण कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
भगतसिंह कोश्यारी भाजपचे एजंट होते: संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्याची बातमी समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाता जाताही भगतसिंह कोश्यारी यांना सोडले नाही. राऊत यांनी कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात भाजपचे एजंट म्हणून काम केले. ते काम घटनाबाह्य होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?
कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची वर्णी लागली आहे. ते लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील. रमेश बैस हे सातवेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. २०१९ मध्ये त्यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ते झारखंडचे राज्यपाल झाले आणि आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यपालांचा राजीनामा मंजूर पण अद्याप माफी मागितली नाही, सुषमा अंधारेंचा घणाघात