Gajanan Maharaj Revealed Day 2023 गजानन महाराज प्रकट दिन : त्यांच्या जीवनाचे गूढ जाणून घेऊया

आज १३ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाच्या साली देखील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता ‘श्रींचा प्रगटदिनोत्सव संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.

गजानन महाराजांचे जीवन

गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना ‘गिणगिणेबुवा’, ‘गजानन महाराज’ अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात.

स्वामी समर्थ आणि गजानन महाराज

अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.

लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज

लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ‘गीतारहस्य’ ही भगवदगीतेवर टीका लिहिली. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला. कारणपरत्वे महाराजांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणीही भ्रमंती केली.

​विठ्ठलाची आज्ञा

गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.

Source link

gajanan maharajGajanan Maharaj and shri swami samarthgajanan maharaj prakat dingajanan maharaj revealed day in marathi ​lokmanya tilakshegaonगजानन महाराजगजानन महाराज प्रकट दिन 2023लोकमान्य टिळकश्री स्वामी समर्थ
Comments (0)
Add Comment