हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संभाजी भिडे यांची सांगलीत भेट
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा भेटीला तीव्र आक्षेप
- मुख्यमंत्र्यांनी भिडेंना काय आश्वासन दिलं? – माकपचा सवाल
मुंबई: पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नसला तरी या भेटीवरून मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं या भेटीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा राबवून महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या कौलाशी प्रतारणा करू नये,’ अशी अपेक्षा माकपनं व्यक्त केली आहे.
करोना लढा: मुंबई महापालिकेच्या भात्यात आणखी एक हुकुमी ‘शस्त्र’
उद्धव ठाकरे-संभाजी भिडे भेटीच्या पार्श्वभूमीवर माकपचे राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी संभाजी भिडेंवर तोफ डागली आहे. ‘करोनाशी वैज्ञानिक दृष्टीनं हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी करोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधानं करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट घेणं अत्यंत खेदजनक व धक्कादायक आहे. भिडे हे विद्याविरोधी गृहस्थ असून अनावश्यक विधानं करून अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत,’ असा आरोप आडम यांनी केला आहे.
वाचा: धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस?
‘२०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे भिडे यांनी दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण करून सामाजिक सौख्याचं पालन करणाऱ्या महाराष्ट्रधर्माला भिडे यांनी चूड लावली. या एकाच गुन्ह्यासाठी त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी करायला पाहिजे होती. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. समाजात विष पेरणाऱ्या अशा माणसाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तुरुंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिलं, हे जनतेला समजलं पाहिजे. सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी या विद्याविरोधकाचे पाय धरले होते. या भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे समजायला हवं,’ असं आडम यांनी म्हटलं आहे.
वाचा: ‘राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही’