राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार असून दोन दिवसांत आपण बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असले तरी अधिकृत भूमिका येत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली होती. आमचे सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आहे आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
> एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा.
> नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
> परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा.
> नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी .