हायलाइट्स:
- उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो सोशल मीडियात व्हायरल
- मुख्यमंत्री ठाकरेंनी कोणासमोर जोडले हात?
- सांगली दौऱ्यात नेमकं काय घडलं? राज्यभर चर्चा
मुंबई: पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळच्या एका फोटोची सध्या राज्यभरात चर्चा आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे काही लोकांसमोर हात जोडून उभे असलेले दिसतात. हे लोक नेमके कोण होते? उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी खुर्चीतून का उठले? याची चर्चा सध्या जोरात आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. (When CM Uddhav Thackeray Meets Teacher Delegation in Sangli)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ज्यांच्यासाठी खुर्चीवरून उठले ते होते विश्वनाथ मिरजकर. मुख्यमंत्री ठाकरे जेव्हा सांगली जिल्हा दौऱ्यावर होते, तेव्हा मिरजकर हे त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन द्यायला गेले होते. मिरजकर गेले तेव्हा मुख्यमंत्री खुर्चीत बसले होते. राज्यमंत्री विश्वजीत कदम व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्र्यांना मिरजकरांची ओळख करून दिली. मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. आपल्यासमोर एक ज्येष्ठ शिक्षक उभे आहेत, हे लक्षात येताच मुख्यमंत्री खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडले. प्रश्न समजून घेतले.
वाचा: कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास आणखी सुखद होणार, कारण…
मुख्यमंत्र्यांच्या या नम्रतेनं मिरजकरही भारावून गेले. आपला अनुभव सांगताना मिरजकर म्हणतात, ‘आम्ही अनेकदा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनं दिली. त्यांनी ती खुर्चीत बसूनच हाती घेतली. आम्ही उभे असायचो, फोटो काढायचो. परवा मात्र धक्का बसला. आमच्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे उठून उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी आमचं निवेदन घेतलं. गुरुजणांप्रतीची ही विनम्रता मनाला स्पर्श करून गेली.’

शिक्षकांच्या शिष्टमंडळाचं स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या मिरजकर यांच्यासोबत इतर अनेक शिक्षक होते. मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचं त्यांनाही कौतुक वाटलं. मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो ते एकमेकांना शेअर करत आहेत. ‘राजकीय नेत्यांनी प्रत्येक वेळी सामान्य माणसाला भरभरून पैसे, निधी, मदत द्यायलाच हवी, असं नसतं. थोड्याशा सन्मानानंही सामान्य माणूस भारावून जातो. हा सन्मान दीर्घकाळ स्मरणात राहतो. शिक्षकांचे प्रश्न कालही होते, आजही आहेत, उद्याही असतील. कुठल्याच घटकाचा प्रश्न कधीच शंभर टक्के संपत नसतो. तो हाताळताना उच्चपदस्थ व्यक्ती संबंधितांविषयी किती आत्मीयता दाखवतात, हा खरा मुद्दा असतो,’ अशी भावना व्यक्त होत आहे.
वाचा: मोठी बातमी! लोकल ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत