हायलाइट्स:
- महाराष्ट्रात आज अनेक निर्बंध शिथील
- हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी कार्यालयांना मुभा
- जाणून घ्या कोणत्या अटींचं पालन करावं लागणार…
मुंबई : राज्यातील करोना संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य हळूहळू अनलॉक करण्याच्या दृष्टीने सरकारकडून पाऊल टाकलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच आज अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी कार्यालयांना मुभा देताना शासनाने काही अटीही लादल्या आहेत.
राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहील, असं राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना काय काळजी घ्यावी लागणार?
सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक/ व्यवस्थापनाने त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी आणि या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण) माहिती/प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी. तसंच सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
दुकाने / उपहारगृहे / बार /मॉल्सचे/कार्यालये/औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जंतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसंच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडिकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिश्यू पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपद्धतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता १८६० मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.