केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात दहावीच्या परीक्षेत राज्यातील ९६.९२ टक्के विद्यार्थी, तर बारावीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, यंदा राज्यातील बारावीचा निकाल तब्बल ५.३८ टक्क्यांनी घटला आहे; तर दहावीचा निकाल १.२८ टक्क्यांनी घटला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल घटले असतानाच ९० आणि ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. यंदा देशातील ४४,२९७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे. तर एक लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. हे प्रमाण परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या ९.०४ टक्के आहे.
त्याचवेळी गेल्यावर्षी दहावीत ६४ हजार ९०८ जणांना दहावीत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी २ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले होते.
तर यंदा देशात बारावीत २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक, तर १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षी बारावीत ३३ हजार ४३२ जणांना ९५ टक्क्यांहून अधिक, तर १ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.
दहावी, बारावीचा ‘सीबीएसई’चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, करोनानंतर निकाल उंचावल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सुमारे वीस शाळांमध्ये ‘सीबीएसई’ बोर्डाचे धर्तीवर दहावी, बारावीचे शिक्षण दिले जाते. बहुतेक सर्वच शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
पोदार स्कूल
‘सीबीएसई’ बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेचा विद्यार्थी अनिरुद्ध वीरेंद्र गायकवाडने ९६.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ध्रुविका पंड्या या विद्यार्थीनीने ९४.२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. पद्मजा छटोरीकरला ८९.२ टक्के गुण मिळाले, तिचा शाळेत तृतीय क्रमांक आला. सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य रवींदर राणा यांनी अभिनंदन केले आहे.
क्लोवर डेल स्कूल
एमजीएम क्लोवर डेल स्कूलने सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या शाळेचे ४१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी २९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह यश संपादन केले. बारा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ओंकार बोर्डे याला ९६.२० टक्के गुण मिळाले व तो शाळेतून पहिला आला. पुष्कर भोगावकर शाळेतून दुसरा आला असून, त्याला ९५.२० टक्के गुण मिळाले. वेदांत अग्रे याला ९५ टक्के गुण मिळाले आणि तो शाळेतून तिसरा आला. पारोल पाटणी व वृषाली राठोड या दोघी मुलींमधून प्रथम आल्या. त्यांना ९१.४० टक्के गुण मिळाले.
या यशाबद्दल एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, शाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, उप संचालिका नम्रता जाजू, प्राचार्य गणेश तरटे, उप प्राचार्या वर्षा पोतदार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.