‘काऊंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या ‘इंडियन स्कूल सर्टिफिकेट’ (आयएससी) परीक्षेत राज्यातील ९८.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, देशपातळीवर ९६.९३ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
देशातील एक हजार २९१ शाळांतील ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात ५१ हजार ७८१ विद्यार्थी, तर ४६ हजार ७२४ विद्यार्थिनींनी समावेश होता. यंदा या परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्यावर्षी ९९.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तसेच, करोनापूर्वी ९७.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे करोनापूर्वीच्या तुलनेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किंचितसे वाढले आहे.
राज्यातील केवळ चार हजार ११३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलींची संख्या दोन हजार १७९, तर मुलांची एक हजार ९३४ आहे. यातील दोन हजार १५७ विद्यार्थीनी आणि एक हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच २२ मुली आणि ३२ मुले अनुत्तीरण झाले आहेत.
ठाण्यातील विद्यार्थिनी पहिल्या रँकमध्ये
‘आयएससी’ बारावीच्या परीक्षेत ठाण्यातील इप्शिता भट्टाचार्य ही पहिल्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या सर्वांना ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत. तर पहिल्या तीनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील आठ जणांचा समावेश आहे.
‘आयसीएसई’त चमकले नाशिकचे विद्यार्थी
नाशिक शहरातील सर्वच आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे.
रायन इंटरनॅशनल स्कूल
रायन इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. २३२ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर ५३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. आर्यन जठार (९८.८०), किनिशा जोशी (९८.६०) व रुजल कारवा (९८.२०) यांनी शाळत पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान पटकावले.
फ्रवशी इंटरनॅशनल स्कूल
‘फ्रवशी’ने नेहमीप्रमाणे यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अर्णव देवस्थळीने (९९) पहिला, लारण्या खैरनार (९८.८०) व तन्वी प्रभू (९९.८०) यांनी दुसरा, तर मानसी कुलकर्णी (९८.६०) तिसरा क्रमांक पटकावला.
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स
‘अशोका ग्रुप ऑफ स्कूल्स’च्या अशोका मार्ग व अर्जुन नगर या दोन्ही शाळांचा दहावी व बारावी या दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला. दहावीला अशोका मार्ग शाळेतील प्रचेत लुनिया (९८.८०), रिया बधान (९८.६०) व शुभलक्ष्मी सुब्रमण्यम (९८.४०) यांनी पहिल्या तीन क्रमांकावर स्थान पटकावले. तर अर्जुननगर शाळेतील पहिल्या तीन स्थानांवर मानव खांदवे (९८.६०), परव सक्सेना (९७.८०) व हरज्योत सिंग मीन (९७.६०) यांनी यश मिळविले. अशोका मार्ग शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सायन्स शाखेत नवीनकुमार लक्ष्मणराज व शीतलकुमार कसालीवाल (९७.५) यांनी, तर वाणिज्य शाखेतील धवन शेट्टी व गर्गेश पाटील (९३.२५) यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
होरायझन अॅकॅडमी
‘मविप्र’ संचलित होरायझन अॅकॅडमीचा निकालही १०० टक्के लागला आहे. वेदिका शुक्ल आणि आदित्य काकुस्ते (९९.२०) यांनी पहिला, आशिष रकिबेने (९८.६०) दुसरा, तर श्रुंगी आरोटेने (९८.२०) या परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयात १०० पैकी १०० गुण पटकावले आहेत.