नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईः राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari)या पत्रानंतर शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray)टीका होत आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठेकेदार चांगलं काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन जर कोणाला त्रास देत असेल तर तो ताबडतोब थांबवला पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

‘मी मागील ३० वर्षांपासून समाजकारणात व राजकारणात काम करत आहे. त्या दरम्यान नेहमी सांगत आलोय की, हा जनतेचा पैसा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला गेला पाहिजे. तो दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘मी पावणेदोन वर्ष झाले मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्या दरम्यान अनेक उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचे एकच सांगणे असते. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा कटाक्ष त्यांचा असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा, विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणी ते लक्ष घालतील आणि शहानिशा करतील, याबद्दल मला १०० टक्के खात्री आहे. त्यामधून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Source link

ajit pawarNitin GadkariUddhav Thackerayउद्धव ठाकरेनितीन गडकरीशिवसेना
Comments (0)
Add Comment