हायलाइट्स:
- नागरिकांकडून महसूल प्रशासनाला चक्क बेशरम पुरस्कार
- अधिकाऱ्यांवर केले गंभीर आरोप
- आरोप झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई होणार का?
सोलापूर : टेंभुर्णीच्या नागरिकांनी आज महसूल प्रशासनाला चक्क बेशरम पुरस्कार दिला आहे. टेंभुर्णीच्या वादग्रस्त मंडलाधिकारी मनिषा लकडे यांच्याविरोधात प्रशासनाकडे विविध तक्रारी केल्यानंतरही प्रशासनाने लकडेंना पाठीशी घातलं, असा या नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवरच महसूल प्रशासनातील प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडलाधिकारी मनिषा लकडे यांना बेशरम पुरस्कार प्रदान देत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.
दहिवली येथील हवालदार यांची नवीन शर्थ जमीन परस्परांच्या नावावर करणे, अकोले येथील वाघे यांच्याकडे उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना न्यायालयाचा अवमान करत बेकायदेशीर नोंद प्रमाणित करणे, बेंबळे ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणाची क्रमवारी जाणीवपूर्वक बदलणे, असे आरोप टेंभुर्णी येथील नागरिकांनी मंडलाधिकारी मनिषा लकडे यांच्याविरोधात केले आहेत.
शासकीय पदाचा गैरवापर करत बेहिशोबी स्थावर व जंगम मालमत्ता जमवलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करत जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (भैय्या) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला बेशरम पुरस्कार देऊन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तरीही सदर पुरस्कार नोंदणीकृत टपालाने पाठवून देण्यात आल्याचे सांगत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यावेळी युवक अध्यक्ष किरण भांगे, प्रहारचे जिल्हा संघटक विठ्ठल आबा मस्के, युवासेना जिल्हासरचिटणीस दत्ताजी गोरे, नानाभाऊ पटोले युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आकाश पराडे-पाटील, भाजप किसान मोर्चाचे तालुका समन्वयक अनिल भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे शिवराम गायकवाड, पोपट जमदाडे, संजय दळवी आदी उपस्थित होते.