हायलाइट्स:
- प्रवीण गायकवाड यांच्यावर मनसेच्या नेत्यांची टीका
- गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून केलीय राज ठाकरेंवर टीका
- मनसेच्या पुण्यातील नेत्यांचा गायकवाड यांना मर्यादेत राहण्याचा इशारा
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जळजळीत टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. ‘लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेच्या स्थानिक नेत्यांनी गायकवाड यांना दिला आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडंच राजकारणातील जातीयवादावर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमुळं राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाली. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं?,’ असा सवालही त्यांनी केला होता. राष्ट्रवादीबरोबरच त्यांना रोख संभाजी ब्रिगेडकडे होता. राज यांच्या या वक्तव्याला प्रवीण गायकवाड यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणजे राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला माणूस आहे. त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला हा प्रश्न विचारण्याचं धाडस राज ठाकरेंनी दाखवावं,’ असं आव्हानही गायकवाड यांनी दिलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी राज यांना दिला आहे.
वाचा: ‘राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले राज ठाकरे आता स्वत:च्या फायद्यासाठी…’
गायकवाड यांची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. मनसेला मात्र गायकवाड यांची ही पोस्ट चांगलीच खटकली आहे. पुण्यातील स्थानिक नेत्यांनी गायकवाड यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. ‘२०१९ च्या लोकसभेला तू पुण्यातून इच्छुक होतास. मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड असं सांगत गल्लोगल्ली फिरत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिलाय.
मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील गायकवाड यांच्यावर नाव न घेता टीका केलीय. ‘राजसाहेब ठाकरे हे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात. रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक अशी स्पष्ट भूमिका घेतात. एकविसाव्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्यासंदर्भात बोलतात. माणुसकी ही एकच जात आणि महाराष्ट्र हा एकच धर्म मानतात. तरीही काही असंतुष्ट, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलावं,’ असं रुपाली पाटील यांनी सुनावलंय.
वाचा: ‘त्या’ घोषणेमुळं पंकजा मुंडेंना राग अनावर; समर्थकांना जाहीरपणे म्हणाल्या…
‘पात्रता सोडून बोललात तर महाराष्ट्र सैनिक व राजदूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं. आमचे राज साहेब नुसतं बोलत नाहीत तर कामही प्रचंड करतात. उगीच लोक ‘कृष्णकुंज’वर अडचणी घेऊन येत नाहीत,’ असंही रुपाली पाटील यांनी म्हटलंय.
वाचा: LIVE मोदींनी ठाण्याचा वनवास संपवला; कपिल पाटील यांची स्तुतीसुमनं