तुम्हालाही व्यक्त व्हावं वाटतं? तुकोबारायांच्या भावना कशा अभिव्यक्त होतात ते पाहा

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री

जगातील कोणताही मनुष्य असो, अभिव्यक्त झाल्याशिवाय त्याचं मन हलकं होत नाही. प्रसन्नता वाढीस लागत नाही. सुख असो वा दु:ख, त्याची अभिव्यक्ती झालीच पहिजे. या जगात अभिव्यक्त होण्यासाठी कोणावर विश्वास ठेवावा? भावनेची कदर करणारे कोण आहेत? लोक ज्ञानाला मानतात. आदरासह प्रेमही करतात. समस्या आहे, ती भावना व्यक्त करण्याची. व्यक्त झालेल्या भावनेचा कोणी दुरुपयोग करू नये, याची सतत भीती असते. व्यक्त झाल्याशिवाय मोकळंही वाटत नाही. कोण कधी बदलेल हेही सांगता येत नाही. इथं मानसिक आधाराची गरज असते. केवळ आधार नाही, तर आधारासह प्रेम देणारा विश्वासू हवा असतो. त्यानं काही नाही दिलं तरी चालेलं; परंतु अभिव्यक्त झालेल्या भावना ऐकाव्यात, मला समजून घ्यावं, माझी सांत्वना करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणजे भक्तराज अर्जुनाचा आधार. माऊलीची ओवी पाहा :

तू गुरू बंधु पिता। तू आमुची इष्ट देवता।
तूचि सदा रक्षिता। आपदी आमुते।। ज्ञा. २-५९

अर्जुन आपलं सर्व नातं देवाशी जोडतो. गुरू, बंधू, पिता यांशिवाय तूच आमची आवडती देवता आहेस. युद्धात अनेक महारथी अर्जुनानं मारले. भगवान श्रीकृष्ण युद्ध करीत नसले, तरी ते आधार होते. दुर्योधनाचं सैन्यबळ अधिक होत; तरीदेखील त्याला हार पत्करावी लागली. विश्वासयुक्त आधार महत्त्वाचा आहे.
संत अव्यक्त निराकाराला आपल्या हृदयात अनुभवतात. भक्ती सगुणाची करतात. आराधना विठ्ठलाची असते. निर्गुण तत्त्व श्रेष्ठ आहे, यात शंका नाही; पण बोलायचं झाल्यास कोणाकडं अभिव्यक्त व्हावं? ज्ञानेश्वरीत हे प्रसंग अनेक वेळा आले आहेत. या विषयात भक्ताची मानसिकता लक्षात येऊ शकते; परंतु भगवान श्रीकृष्णाचीही हीच समस्या आहे. भगवंत म्हणतात, हा जर ब्रह्मस्वरूप झाला, तर मी कोणाबरोबर बोलणार, कोणाला आलिंगन देणार? मित्र भेटला, तर तोंडभरून बोलता येतं. देवालादेखील अभिव्यक्त व्हावंसं वाटतं.

दिठीची पाहता निविजे। कां तोंड भरोनि बोलिजे।
ना तरी दाटूनि खेव दीजे । ऐसे कोण आहे।। ज्ञा. ६-११७

ज्याला पाहिल्यानंतर डोळे निवतात, असा एक जीवनात असला पाहिजे. संत अव्यक्ताला व्यक्त करून स्वत: अभिव्यक्त होतात. भूपाळ्याचे अभंग हे आत्मनिवेदन आहे. काकडा झाल्यानंतर भूपाळ्याचे अभंग असतात. संवेदनशील हृदय असेल, तर या अभंगांचा भाव आपोआप समजतो. तुकोबाराय म्हणतात, ‘देवा, कां गा किविलवाणा केलो दीनाचा दीन।’ जे विघ्नसंतोषी आहेत, ज्यांच्यामुळं भजनात व्यत्यय येतो, ‘जळोत ती येथे उपजविती अंतराय।’ संसारात पुरुष असूनदेखील अनेकांना सासुरवास आहे. मोकळेपणानं वागता येत नाही. ‘सासुरवासा भीतो जीव ओढे तुजपासी।’ विशेष म्हणजे, संसारात सर्वच स्तरातील माणसं कामाला बळी पडतात. काम चांगल्या चांगल्यांची फजिती करतो. मानहानी करून जीवन उद्ध्वस्त करतो. या कामामुळंच देव दिसत नाही. तुकोबारायांच्या भावना कशा अभिव्यक्त होतात ते पाहा, ‘कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख। बहु वाटे दु:ख फुटो पाहे हृदय।’ जगात कोणीही असो, त्याला भावना अभिव्यक्तीची इच्छा आहे. भगवंताची गरज इथं आहे. संसारात बदल होत नसतात; परंतु भावनेला वाट हवी असते. प्रेम प्रवाहित व्हायला हवं. मोकळं वाटण्यासाठी, मुक्तता भोगण्यासाठी अभिव्यक्ती गरजेची आहे. अभिव्यक्त होण्यासाठी समोरचा विश्वासू हवा. मिळणं तसं अवघड असतं; पण मिळायलाच हवा.

बुद्धीला ज्ञान आणि हृदयाला प्रेम हवं असतं. ज्ञानाला अधिकारी लागतो, प्रेमाला विश्वासूची गरज असते. ज्ञानप्राप्तीसाठी कष्ट लागतात. प्रेमासाठी भावना हव्यात. ज्ञानासाठी श्रीगुरू सेवा महत्त्वाची असते. प्रेमात समर्पण महत्त्वाचं असतं. अधिकारपरत्वे मनुष्य आपल्या स्वभावावर जातो. स्वभाव कोणताही असला, तरी त्याला अभिव्यक्तीची गरज असते. श्रीगुरू आणि देव यांच्याशिवाय अभिव्यक्त होऊ नये. देवापर्यंत नेणारे श्रीगुरू असतात, ते दिंडी घेऊन वारी करतात. अभंगांच्या संगतीत वारी करणाऱ्याला ते भेटतात आणि त्यांच्यासोबत देव दर्शनही होतं.

Source link

dr namdev shastriexpress your feelingsshri krishnatukobaतुकोबादेव दर्शनन्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीश्रीकृष्ण
Comments (0)
Add Comment